नवी दिल्ली – पुढील लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत एनडीए आणि इंडिया या आघाड्यांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, 91 खासदार असणाऱ्या 11 पक्षांनी अद्याप कुंपणावर बसणेच पसंत केले आहे. ते पक्ष तूर्त तरी दोन्ही आघाड्यांपासून दूर आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ आघाडीत (एनडीए) 39 पक्ष सहभागी झाले आहेत. तर, कॉंग्रेससह 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी (इंडिया) स्थापन केली आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांचे मिळून घटक बनलेले 65 पक्ष पुढील वर्षीच्या राजकीय महासंग्रामासाठी जवळपास सज्ज झाले आहेत.
पण, लोकसभेत प्रतिनिधित्व असणारे 11 पक्ष सध्या तरी तटस्थ राहिले आहेत. त्यामध्ये वायएसआर कॉंग्रेस, बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती, बहुजन समाज पक्ष, एआयएमआयएम, तेलगू देसम, शिरोमणी अकाली दल, एआययूडीएफ, जेडीएस, आरएलपी आणि एसएडी(मान) या पक्षांचा समावेश आहे. त्यापैकी वायएसआर कॉंग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि बिजू जनता दल हे पक्ष अनुक्रमे आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांत सत्तेवर आहेत.
साहजिकच, सध्या तटस्थ असले तरी त्या सर्वच पक्षांना लोकसभा निवडणुकीत महत्व असेल. त्या निवडणुकीत कुणालाही बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास कुंपणावर बसलेल्या पक्षांची भूमिका कळीची ठरू शकेल.