सांगली : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असून प्रत्येक देश त्यांच्या पातळीवर या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी इस्लामपूर- सांगली ने एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे. इस्लामपूरमध्ये असलेले कोरोनाचे चौदा रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले आहेत.
सांगली जिल्ह्यातील नागरिकांवर माझा मोठा विश्वास आहे. नागरिक लॉकडाऊनचे पालन अत्यंत चोखपणे करत आहेत. त्याबाबत मी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानतो. लोकांची कोणतीच गैरसोय होणार नाही. त्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा मिळतील याची काळजी शासन, प्रशासन घेत आहे, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आपल्या जनतेस दिले. केवळ आश्वासन न देता ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी मंत्री महोदय कार्यरत झाले.
खानापूर, आटपाटी, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, मिरज ,सांगली, वाळवा, इस्लामपूर अशा सर्व तालुक्यांचा आढावा प्रत्यक्ष त्या त्या भागात भेटी देऊन घेतला. त्या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी, सर्व संबंधित अधिकारी यांना विश्वासात घेऊन सखोल चर्चेद्वारे स्थानिक अडचणींचा विचार करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन केले.