सातारा – सातारा जिल्ह्याला शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि महाबळेश्वर, पाचगणीत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि तुफान गारपीट झाली. या पावसामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. साताऱ्यात शाहूनगर येथील मंडळी कॉलनीमध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने घबराट पसरली होती.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. हा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरला. सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. त्यामुळे उकाडाही वाढला होता. त्यामुळे दुपारी पाऊस येणार, अशी अटकळ होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुपारी 4 वाजल्यापासून जोरदार वारे वाहत होते. त्यानंतर सायंकाळी ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. पावसाने सायंकाळी साडेपाचनंतर जोर पकडला.
सातारा, जावळी, कराड, वाई, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये तासभर जोराचा पाऊस झाला. भिलार, खिंगर, मेटगुताड येथे गारा पडल्या. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी पावसाचा आनंद लुटला. सातारा शहरात सुमारे तासभर झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. शाहूनगरातील मंगळाई कॉलनीत नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला होता.