कोठे नेऊन ठेवलायं महाराष्ट्र माझा म्हणण्याची नागरिकांवर वेळ
रविंद्र वाळके
अवसरी- महाराष्ट्रात राजकीय धक्क्यावर धक्के बसत असून भविष्यात आणखी धक्के बसण्याची धक्यता सर्वच राजकीय पक्षांकडून वर्तविली जात आहेत. नेत्यांची सत्तेच्या मागे धावण्याची जणू स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोठे नेऊन ठेवलायं महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सध्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे सर्वसामान्य जनता मात्र संभ्रमात असल्याची दिसून येत आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजप आणि मित्र पक्षांना भरघोस मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यानंतर येणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहण्याचा राजकीय पुढाऱ्याच्या विचार बदलला असल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार निवडून येईल या आशेवर अनेक पक्षांतील आजी-माजी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. फक्त कोणत्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवता येईल आणि सुरक्षित मतदार संघ मिळेल याची चाचपणी सुरू आहे. त्यानुसार रणनीती आखण्यात अनेक मातब्बर आजी-माजी आमदार, माजी खासदार तसेच अनेक जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत.
तसे पाहिले तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक वजनदार पुढारी लोकसभेच्या निवणुकीपूर्वीच आउट गोईंग व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर निवडणूक पार पडली केंद्रात भाजप आणि मित्रपक्ष आघाडीचे सरकार निवडून आले. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार, माजी मंत्री आणि त्यांचे नातेवाईक राजकारणात “लॉंग लाईफ व्हॅलीडीटी’ शोधण्यात मग्न आहेत.
शिवसेनेचा कार्यकर्ता हा जहाल, कडवट, आक्रमक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिवसेनेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदार प्रवेश करणार नाही असे वाटत असतानाच याला छेद देत सचिन अहिर यांनी प्रवेश केला. सचिन अहिर, चित्रा वाघ, रणजितसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड, वैभव पिचड अशी मात्तबर मंडळीसह अनेक प्रमुख राजकीय नेते आपल्या पक्षाला रामराम करून इतर पक्षाबरोबर नवीन घरोबा करताना दिसत आहे.
राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, वरिष्ठ नेते हे व्यासपीठावरून जनतेला तसेच कार्यकर्त्यांना आपल्या विषयी आणि पक्षाविषयी किती एकनिष्ठ आहोत हे पटवून देत असतात. हे ऐकून गरम डोक्याचे कार्यकर्ते आपलाच नेता आणि आपलाच पक्ष किती चांगला आहे हे पटवून देत असताना अनेकदा आपापली भावकी, भाऊबंद, गावकरी, मित्र यांच्यात राजकारणावरून शत्रुत्व निर्माण करीत आहेत. राजकीय पुढारी, नेते एका रात्रीत पक्ष बदलतात, परंतु कार्यकर्त्यांचे काय? काल नेत्यांच्या सांगण्यावरून किंवा आपला नेता, आपला पक्ष किती चांगला आहे हे पटवून देण्याच्या नादात आपली भाऊबंद, भावकी, मित्र यांच्यापासून दूर गेले आहेत.
राजकारणात नाव, पैसा, पद मिळवले आहे. काही खासगी तसेच सहकारी संस्था सुद्धा उभ्या केल्या आहेत. त्यांना पाठबळ द्यायचे असेल तर सत्तेत असणे जरुरीचे असते. एकदा सत्तेची ऊब आणि खुर्चीची सवय लागली की सत्ता आणि खुर्चीपुढे माणूस आंधळा बनतो. यानुसार सत्ता आणि खुर्ची यासाठी पक्षनिष्ठा आणि जनतेच्या भावना खुंटीला ठेऊन पक्षांतर करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होऊ घातला आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे.
- नेत्यांची पाळवा पाळावी लोकशाहीला घातक
पक्षनिष्ठेच्या गोष्टी जनतेला आणि कार्यकर्त्यांना अशा आयात केलेल्या नेत्यांकडून व्यासपीठावरून शिकवल्या जातात. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून या उक्तीप्रमाणे जिकडे घुंगऱ्या तिकडे उदोउदो या उक्तीप्रमाणे वागणारे नेते दिसत आहेत. सध्या सुरू असलेली नेत्यांची पाळवा पाळावी लोकशाहीला घातक ठरणारी आहे. तसेच भविष्यात सर्वसामान्य जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागतील यात शंकाच नाही.