आंबेगाव तालुक्यात पंचनामे कधी? ः द्राक्ष, केळी, कांदा पिकांचे नुकसान
मंचर- आंबेगाव तालुक्यात परतीच्या पावसाने ऊस, द्राक्ष, केळी, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे; परंतु दिवाळीची सुटी संपूनही पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून टप्प्याटप्प्याने पाऊस पडत आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून आहे, तर काही शेतकऱ्यांचा उत्पादन घेतलेल्या ऊस, द्राक्ष, कांदा पिकांच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेंगडेवाडी, कळंब, चांडोली, महाळुंगे पडवळ, नांदूर, विठ्ठलवाडी, नागापूर इत्यादी गावांत द्राक्षांचे मळे आहेत. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागांचे लोखंडी अँगल वाकडे झाले आहेत, तर काही ठिकाणी भुईसपाट झाले आहेत. कांदा पिके पूर्णपणे पाण्यात गेल्याने कांद्याची रोपे सडली आहे.
आंबेगाव तालुक्यात सततच्या पावसाने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि आता परतीच्या पावसानेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दिवाळीची सुटी संपून दोन दिवस झाले आहेत. ऊस, द्राक्ष, कांदा, बटाटा पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. शासकीय कार्यालयात ग्रामसेवक, कृषी अधिकारी उपलब्ध नाही. भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचे फोन “नॉट रिचेबल’ असतात. दिवाळी सुटी मंगळवारी संपली. मात्र, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी काही कार्यालयांमध्ये सरकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.