उरूळी पोलीस सराईत गुन्हेगारांना घाबरले
भाजपच्या पदाधिकाऱ्यांमुळे टपरीचालकाला न्याय
उरुळी कांचन – अंडाभूर्जीचे पैसे मागितले म्हणून पाच जणांच्या टोळक्यांने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकातील अंडाबुर्जीच्या टपरी चालकाला कोयता व लाकडी दांड्याच्या सहाय्याने मारहाण करून गल्ल्यातील सत्तावीशे रुपये लुटले. हा प्रकार गुरुवारी (दि.23) रात्री घडला आहे.
टपरी चालकाला मारहाण करणारे गुन्हेगार रेकॉर्डवरील असतानाही उरुळी कांचन पोलिसांनी मात्र पहिले आरोपी शोधू, मगच गुन्हा दाखल करु, असे म्हणत तब्बल पंधरा तासांहून अधिक काळ गुन्हा दाखल केला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांची भेट घेतल्यानंतर, उरुळी कांचन पोलिसांनी तब्बल पंधरा तासांच्या दिरगांईनंतर गुन्हा दाखल करुन घेतला. मात्र, पंधरा तासांच्या दिरगांईनंतर गुन्हा दाखल करतानाही उरुळी कांचन पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने पाच ऐवजी तीनच आरोपी गुन्ह्यात सहभागी असल्याचा ‘एफआयआर’मध्ये उल्लेख केल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी लक्ष्मण उर्फ लखन धोंडीबा ढवळे यांनी केला आहे.
लक्ष्मण उर्फ लखन धोंडीबा ढवळे (रा. तळवडी चौक, काळेवाडा, उरुळी कांचन ता. हवेली), असे मारहाण झालेल्या टपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी धिरज नागटिळे, सैलानी शेख व अदित्य मानकर (पूर्ण नावे माहीत नाहीत, सर्व रा. उरुळी कांचन ता. हवेली) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे तीनही आरोपी फरार झाले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांकडून दखल
फिर्यादी ढवळे यांनी तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठले. संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. मात्र, त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. पोलिसांनी ढवळे यांना माघारी पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी ढवळे यांनी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. यावर कार्यकर्ते आबासाहेब चव्हाण, उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन यांनी याप्रकरणी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करुन घेतला.