कुठेतरी चार दिवस बाहेर गावी जायचा विचार करत होतो. मुलांच म्हणणं असं होतं की इतर कुठे ही न जाता यावेळी आपण दूर कुठतरी निसर्गाच्या सान्निध्यात जावं. या शहरी वातावरणापासून, या धकाधकीच्या जीवनापासून, या गर्दी आणि गोंगाटापासून दूर अशा एखाद्या वेगळ्या वातावरणात की जिथे आपलं मन रमेल, ताजेतवाने होईल.त्याच वेळी माझं लक्ष हे वृत्तपत्रातील एका ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातीवर गेलं.लोकांना आकर्षित करणारी व्यावसायिक जाहिरात काहीशी अशी होती-
“निसर्ग… या सृष्टीतला एक असा दिव्य चमत्कार की जो आपल्या मनाला प्रफुल्लित करतो, उत्साही करतो, उघड्या डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करताना तो आपल्याला बरंच काही सांगून शिकवून जातो. निसर्ग म्हणजे काय? तर सागर, धरती, आकाश, पर्वत, नद्या, सूर्य, चंद्र, प्राणी, पशु, पक्षी, वृक्ष, लता, वेली, फुलं, फळं आणि फुलपाखरे!
या निसर्गातले हे बारीकसारीक घटक आपल्याला बरंच काही सांगून शिकवून जातात. पण कधी! तर आपण त्यांच्या जवळ गेलो, त्याचं बारकाईने, द्रष्टेपणाने निरीक्षण केले, त्यांच्याशी सुख-संवाद, जवळीक ही साधली तर! होय ना? मग चला आमच्या सोबत त्या निसर्गाच्या कुशीत. मनमुराद निर्भेळ आनंद लुटायला, बागडायला आणि सुरेल नवीन जीवन गाणे गायला…’
मी ती जाहिरात पाहिली, तारखा पाहिल्या, त्या आमच्याशी मिळत्या-जुळत्या नव्हत्या आणि आता काय करावे असा विचार करत असताना मला एकदम आठवण आली आणि त्याच वेळी मी मुलांना म्हणालो, “अरे! मला असं वाटतं की आपण कोकणात मावशीकडे जाऊया चार दिवसांसाठी.’ “खरचं, किती छान! आम्ही लगेच तिला फोन करतो’, असं म्हणून मुलांनी आनंदाने ती जबाबदारी उचलली.
कोकणातील निसर्गसौंदर्य पाहायला मिळणार म्हटल्यावर तेही सुखावले. त्यांनी लगबग केली आणि तयारी केली. मग काय! खरोखरच दुसऱ्या दिवशी आम्ही गाडी काढली आणि बाहेर पडलो ते त्या निसर्गाच्या कुशीत शिरण्यासाठी. त्याच्याशी जवळीकतेचं एक नवं नात जोडण्यासाठी…