पहाटे वनभोजन करण्याची परंपरा याच मार्गशीर्ष-पौष मासातील आहे. हाच काळ “धुंधूरमास’ म्हणून ओळखला जातो.
मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष असा धार्मिक अर्थ घेता येतो. कार्तिक संपून मार्गशीर्ष सुरू होतो आणि मार्गशीर्ष संपल्यानंतर पौष सुरू होतो.
हेमंत ऋतूची सुरुवात पहाटे बोचरी थंडीने होते. शरीरातील अग्नीचे प्राबल्य वाढून भूक जास्त लागते. आरोग्यशास्त्र सांगते की, भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये. भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर जठरातील अग्नीलाही इंधन हवे असते ते योग्य वेळी मिळाले नाही, तर तो विझून जातो. अन्न हे त्याचे इंधन अन्यथा शरीरातील रस, रक्त, धातू कमी होऊन थकवा जाणवतो.
अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे. म्हणून मग सूर्योदयापूर्वी आहार घेतला जातो. पहाटे वनभोजन करण्याची परंपरा याच मार्गशीर्ष पौष मासातील तो काळ “धुंधूरमास’ म्हणून ओळखला जातो. सूर्य जी देवता आपण सहज डोळ्याने पाहू शकतो, वर्षात 12 राशींतून भ्रमण करत असतो, तो या महिन्यात धनु राशीत असतो याला धनुर्मास असेही म्हणतात. हा काळ 13-17 डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन 13-15 जानेवारीला संपतो. हिंदू पंचांगात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो. मकरसंक्रांत भोगी हा शेवटचा दिवस मानतात.
यावेळी हवेत गारठा असतो. विशेषत: रात्र मोठी असते. जठराग्नी या नाभीस्थानी कोंडला गेल्याने भूक वाढते म्हणून सूर्योदयादरम्यान आहाराचे महत्त्व यातही लेकुरवाळी भाजी भोगीला केली जाते. मूगडाळ खिचडी, बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली अशी पदार्थांची रेलचेल, मग थंडीमुळे आलेला शरीरातील कोरडेपणा हा स्निग्ध पदार्थयुक्त आहार शरीराची स्निग्धता वाढवतो.
कोणताही पदार्थ प्रथम अग्नीस अर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे आहेच तसाच हा जठराग्नी. खिचडी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, त्यावर लोणी अशा पदार्थाचे महत्त्व या धुंधुरमासात विशेष आहे. म्हणून आपल्या संस्कृतीत या मार्गदर्शक मार्गशीर्ष-पौषचे महत्त्व आरोग्य धर्म यानुसार असावे.
या महिन्यांत विष्णूची जी जी पूजा पाठ केली जाते त्याचे अगणित पुण्य मिळते तसेच याच महिन्यांत लक्ष्मीपूजा केली जाते. शेवटी काय माणसात देव पाहणे ही विष्णुपूजाच. माणूस म्हणजे शरीर आत्मा याचा मेळ. या शरीराचे भरणपोषण करणारा आहार, अन्न. यामुळे शांत होणारा जठराग्नी ही अग्नीपूजा.
कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो. त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे. म्हणून पूजापाठाबरोबर माणुसकीचाही धर्म, त्यात अन्नदान श्रेष्ठदान असाही अर्थ या मार्गदर्शक धुंधुरमासाचा आरोग्य शास्त्र, धर्म शास्त्र, अध्यात्म शास्त्र आणि संस्कृती यांचा सुरेख संगम. म्हणूनच परिपूर्ण असा धार्मिक धुंधुरमास.
आजच्या फास्टफूडच्या या जमान्यात खिचडीचा कम्फर्ट फूड म्हणून उल्लेख केला जातो. पण हे आपले राष्ट्रीय अन्न सहज सर्वांना परवडणारे, पचनास हलके, अतिशय उपयुक्त अन्न. दमल्याभागल्यानंतर समोर आलेली गरमागरम खिचडी वर तुपाची धार, सोबत एखादी लोणच्याची फोड असेल तर या कम्फर्ट फूडचा आस्वाद काही निराळाच. प्रत्येक पदार्थाला मान आहेच तो मिळायलाच हवा तसाच या धुंधुरमासात या खिचडीचा मान तर राष्ट्रीय अन्न असा दर्जा प्राप्त.
खरे अन्न धुंधुरमासाचे महत्त्व वाढवते, तर बाजरी उत्तम ऊर्जास्रोत, जीवनसत्वे, प्रथिने, बी 6 जास्त आढळते, तर त्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत करते. बाजरीतील तंतुमय पदार्थ पचनास मदत करतात. शरीरास ही बाजरी अतिशय उपयुक्त मानली जाते. गरम अन्न शरीरातील उष्णता वाढवते. साधारण 362-65 कॅलरीज बाजरीतून मिळतात. अशी आहारशास्त्रानुसार उपयुक्त बाजरीची भाकरी या धुंधुरमासात लोणी तूप, प्रथिनयुक्त पदार्थ त्याची गोडी वाढवतात, तर लेकुरवाळ्या भाज्या भाकरीची चव वृद्धिंगत करतात. असा एक परिपूर्ण सात्विक आहाराची ओळख देणारा हा धुंधुरमास.
सूर्य, अग्नी अशा देवतांमुळेच असे पदार्थ आपणास मिळतात म्हणून प्रथम त्यांना ते अर्पण करण्याची प्रथा सांगणारा हा धुंधुरमास. घरातील प्रत्येक पदार्थ यावर ग्रहांचा अंमल असतो. ज्योतिषशास्त्रानुसारही त्याचे महत्त्व सांगता येते. त्यामुळे या पदार्थांचा आनंद घेऊन धुंधुरमास साजरा करूया.