फक्त तीन दिवसांच्या संपाचा इशारा… पहिल्या दिवसाचे काही तासच झालेले… आणि यशस्वी तोडगा… संप मागे! याला म्हणतात “पॉवर’! ज्यांच्या हातात “पॉवर’ आहे, त्यांना संपासारख्या हत्याराचा वापर करून इतक्या लवकर नमवणं सोपं असतं का? पण वीज कर्मचाऱ्यांची बातच और! महावितरण, महापारेषणचे लोक तीन दिवस संपावर जाणार म्हणजे नेमकं काय होणार? या प्रश्नाची शेकडो परस्परविरोधी उत्तरं व्हॉट्सऍप विद्यापीठानं “विद्यार्थ्यां’ना देऊन टाकली.
कुणी म्हणालं, तीन तारखेला मध्यरात्री जो अंधार पडणार, तो तीन दिवसांनीच संपणार. म्हणजे, वीज कर्मचारी वीज बंद करूनच संपावर जाणार! काही जण म्हणाले, “नाही नाही, तसं नाही. वीजपुरवठा सुरूच राहणार. पण… मध्येच जर कुठं बिघाड निर्माण झाला, तर तिथून पुढं अंधार.’ वीजवहनाची एकंदर यंत्रणा राज्यात किती “बळकट’ आहे, हे ठाऊक असल्यामुळे संपूर्ण अंधारापेक्षा या बिघाडानंतरच्या अंधाराला लोक अधिक घाबरले. काही ठिकाणी नेमका तीन तारखेच्या मध्यरात्रीच वीजपुरवठा खंडित झाला.
त्यामुळे पहिलीच शक्यता बरोबर आहे की काय, असं वाटून लोक आणखी घाबरले. “वावर हाय तर पावर हाय,’ म्हणणाऱ्या शेतकरीराजाच्या तोंडचं पाणी पळालं, कारण संप आणि पंप यांचं नातं त्याला समजेना. जिथं पाणीपुरवठा वीजपुरवठ्यावर अवलंबून असतो, तिथल्या घाबरलेल्या बायाबापड्यांनी तर पिंपापासून गडूपर्यंत घरातली सगळी लहानमोठी भांडी पाण्यानं भरून ठेवली.
थोडक्यात, विजेला “पॉवर’ का म्हणतात याचा अंदाज संपाच्या नुसत्या भीतीनंच राज्यभरातल्या लोकांना आला. वीज नसेल तर भल्याभल्यांचा शक्तिपात होतो. आपले मोबाइल कसे चार्ज होणार आणि सगळ्यांचेच मोबाइल डिस्चार्ज झाले तर संदेशवहन कसं होणार, या भीतीनं अनेकांनी संपाचा इशारा मिळताच “पॉवर बॅंक’ खरेदी केली. प्रश्न होता केवळ तीन दिवसांचा… बहात्तर तासांचा! पण वीज जणू आपल्या अंगाअंगात खेळतीये. कमीत कमी वीज वापरून जगायची वेळ आली, तर त्याहून मरण परवडलं असं अनेकांना वाटेल. पण अशी स्थिती केवळ संपामुळेच येईल असं नाही. वीजसंकट कोणत्याही कारणामुळे कोसळू शकतं.
आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेल्या पाकिस्तानची “पॉवर’अशीच क्षीण झालीये. पंतप्रधान कार्यालयानं बोलावलेली बैठक एकही दिवा न लावता पार पाडून सूर्यप्रकाशाचं मार्केटिंग करण्याची वेळ तिथल्या सरकारवर आली. जे पंखे अधिक वीज खातात, त्यांचं उत्पादन पाकिस्तानात येत्या सहा महिन्यांत बंद होणार आहे. पुढच्या महिन्यापासून फक्त एलईडी बल्ब वापरायला परवानगी असणारंय. सरकारी विभागांना तीस टक्के वीजबचतीचे आदेश दिले गेलेत. रात्री साडेआठ वाजता बाजार बंद होतील. एवढंच नव्हे तर लग्नकार्येही रात्री दहाच्या आत उरकायला सांगितलंय.
पाकिस्तानात मुळातच महागाई वाढत चाललेली असताना कोसळलेल्या वीजसंकटामुळे लोक चांगलेच संतापलेत.
वीजबचतीची उपरोक्त योजना काही प्रांतिक सरकारांनी नाकारलीय. पण संकट इतकं गंभीर आहे की, आजही काही ठिकाणी दहा ते बारा तास तर काही ठिकाणी आठ ते दहा तास वीज गायब होत आहे. चार, सहा आणि आठ तासांच्या भारनियमनाचा अनुभव आपल्यालासुद्धा आहेच की! तरी कमीत कमी वीजवापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आपल्याकडे कंजूष, वेडाच ठरवतात.