पुणे : शहराच्या पूर्व भागाला त्यातही प्रामुख्याने नगररस्ता परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजना प्रस्तावित करण्यात आली आहे, या योजनेचे काम पूर्ण झाले असून पुढील काही दिवसात हे पाणी धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, नगर रस्ता भागातील सुमारे 6 ते 8 लाख नागरिकांना मिळणार आहे. मात्र, या पाण्याचा वाटा इतर भागासाठी मागण्यात येत असून हे पाणी आल्यानंतर नगर रस्त्याला पालिकेकडून पूर्वी देण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकारास नगरसेवक अनिल टिंगरे यांनी आक्षेप घेतला असून या भागाचे कोणतेही पाणी कमी देणार नसल्याचा इशारा टिंगरे यांनी दिला आहे.
टिंगरे म्हणाले की, गेली अनेक वर्षे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भागाचे क्षेत्रफळ, लोकसंख्येची घनता पाहता सध्या असलेले पाणी अतिशय कमी आहे. त्यामुळे गेली आठ वर्षे या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन तसेच इतर मार्गातून या योजनेचा पाठपुरावा केला. त्यानंतर आता हे पाणी आम्हाला मिळणार असतानाच, काही लोकप्रतिनिधी भामा- आसखेडचे पाणी इतर भागाला देण्यासाठी तर काही लोकप्रतिनिधी नगर रस्त्याला सध्या देण्यात येणारे पाणी इतर भागात वळविण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे ही मागणी सरासर चुकीची असून त्याला या भागातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आधी आमची पाण्याची मागणी पूर्ण करावी त्यानंतर इतरांना पाणी देण्याचा विचार करावा अशी मागणी टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदारांच्या मागणीलाच आक्षेप
दरम्यान, भामा- आसखेड योजनेचे पाणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास द्यावे अशी मागणी भाजपचेच आमदार शिध्दार्थ शिरोळे यांनी केली आहे. तर नगररस्ता परिसराचे भामा- आसखेड योजने नंतर वारजे, जागतिक पाणी पुरवठा योजन तसेच लष्कर जलकेंद्राचे पाणी हडपसरला देण्याची मागनी नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी केली आहे. त्यामुळे टिंगरे यांनी थेट स्वपक्षाच्या आमदारांच्या मागणीवर आक्षेप घेतला आहे. या भागातील पाणीप्रश्नासाठी आपण महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही वेळ प्रसंगी मुख्यसभेत आंदोलन केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्न आपल्याला महत्वाचा असल्याचे टिंगरे यांनी आपल्या आक्षेपाबाबत बोलताना स्पष्ट केले.