मंचर- डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू सागर) पाचही दरवाजातून शनिवारी (दि. 3) पहाटे 9 हजार 700 क्युसेक वेगाने घोडनदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणाच्या सांडव्यातून अधिक पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने घोडनदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
घोडनदीपात्रात डिंभे धरणातून पाणी सोडल्यामुळे कळंब येथे पूर आला आहे. स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार व शेतकऱ्यांनी घोडनदी पात्रात जनावरे धुण्यासाठी आणि शेतीपंप काढण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंत भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी केले आहे.