– हिमांशू
कुणाचं काय तर कुणाचं काय! हत्यारानं गळा कापल्याचा आरोप असलेल्या केसेसच्या फायली कधी-कधी बराच काळ धूळ खात पडतात. कधी-कधी केसानं गळा कापल्याची केस कोर्टासमोर येते; पण निकाल नेमका कुणाच्या बाजूनं लागला, हेच कुणाला कळत नाही आणि दोन्ही पार्ट्या आपणच केस जिंकल्याचं सांगू लागतात. खऱ्याखुऱ्या केसांचं प्रकरण मात्र थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतं आणि दोन-दोन वेळा सुनावणी झाल्यानंतर तक्रारदारालाच नोटीस बजावयाची वेळ कोर्टावर येते.
आशना रॉय नामक मॉडेलच्या केसांवरून सुरू झालेल्या कहाणीतील गुंतागुंत उत्तरोत्तर अशी वाढत गेली, की केसातल्या गुंत्यालाही लाज वाटावी. झालं असं, की 2018 च्या एप्रिल महिन्यात रॉय मॅडम दिल्लीतल्या आयटीसीच्या मौर्या हॉटेलमधल्या सलूनमध्ये गेल्या. नियमितपणे त्यांची केशरचना करणाऱ्या हेअर ड्रेसर त्यावेळी तिथं नव्हत्या. मग अन्य हेअर ड्रेसरकडून केस कापून घेण्याची विनंती त्यांना केली गेली. खरं तर आशना रॉय त्यासाठी तयार नव्हत्या.
पण आग्रहाखातर त्यांनी अपरिचित हेअर ड्रेसरच्या हाती त्यांचं डोकं सोपवलं. रॉय यांच्या म्हणण्यानुसार, केस कसे कापायचे हे त्यांनी हेअर ड्रेसरला सांगितलं होतं. केस कापताना त्यांना मान खाली घालण्यास सांगितलं गेलं. पण काम झाल्यावर त्यांनी जेव्हा मान उचलली, तेव्हा त्यांना समजलं की केस आपल्या सूचनेनुसार कापले गेलेले नाहीत. नेहमीपेक्षा खूपच जास्त केस कापले गेलेत हे त्यांच्या लक्षात आलं.
आपले केस आता केवळ मानेपर्यंतच पोहोचतात, हे पाहून त्यांना अतोनात दुःख झालं आणि त्यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. केसांचं वाटोळं झाल्यामुळे आपल्या करिअरचंही कसं वाटोळं झालं, याची कैफियत त्यांनी मांडली. त्यांच्या तक्रारीनुसार, केस कमी झाल्यामुळे त्यांना मिळणारी कामं कमी झाली.
त्यांचं करिअर धोक्यात आलं आणि त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. चुकीचे केस कापल्यामुळे एवढा मोठा अनर्थ घडला असल्यामुळे आपल्याला तीन कोटी रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. पण रॉय यांना दोन कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगानं आयटीसी मौर्या हॉटेलला दिले. कालांतरानं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि ग्राहक आयोगाच्या आदेशाला कोर्टानं स्थगिती दिली. आयोगाने याबाबत नव्यानं निर्णय द्यावा, असं कोर्टानं सांगितलं. होता-होता 2023 वर्ष उजाडलं. ग्राहक आयोगाने आपला पूर्वीचाच आदेश कायम ठेवला आणि आयटीसी मौर्या हॉटेलने हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात नेलं. यावेळी मात्र कोर्टाने रॉय मॅडमना स्पष्टपणे बजावलं, मनाला आलं आणि भरपाई मागितली, असं करता येणार नाही.
त्यासाठी नुकसान झाल्याचे भौतिक पुरावे देणं बंधनकारक आहे. साध्या केसांसाठी लोक छळ, अपमान, मानसिक आघात, करिअरचं, उत्पन्नाचं नुकसान, भविष्यातल्या संभाव्य नुकसानीचा हिशेब करतात; मग आमचा शेतकरीदादा उन्हातान्हात राबून त्याला गुंतवलेले पैसेही मिळत नाहीत, तेव्हा त्यानं कुठल्या कोर्टात जायचं आणि किती भरपाई मागायची? केसांची स्टाइल, आकार बदलल्यामुळे करिअरचं नुकसान होऊ शकतं हे मान्यच आहे; पण शेतीमाल शेतातून बाजारात येईपर्यंत बाजारभाव धडाधड कोसळून ज्यांचं सर्वस्व हिरावलं जातं त्यांनी भरपाई कुणाकडे, किती मागायची?