औद्योगिक क्षेत्रातील मंदीवर उपाययोजना
पुणे, दि. 18 – भारतीय इंजिनियरिंग क्षेत्रातील इंजिन उद्योग हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. या उद्योगाचे वार्षिक उत्पादन रुपये 60 कोटींच्या घरात असून त्यात सुमारे 60 हजार लोकांना रोजगार मिळत आहे. तसेच हा उद्योग रुपये 7 कोटींपेक्षा अधिक परकीय चलन निर्यातीद्वारा मिळवीत आहे. तथापि एकूण औद्योगिक क्षेत्रात सौम्य मंदी पसरली असून त्यावर त्वरित उपाय योजण्याचे काम सरकारने केले पाहिजे, असे चंद्रकांत किर्लोस्कर म्हणाले.
योगशिक्षणाची गरज
वाई – योगशिक्षण देण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. योगाविषयी बऱ्याच गैरसमजुती आहेत. योग म्हणजे ध्येय किंवा समाधी असे म्हणता येईल. समाधी अवस्थेत राहणे हा चित्ताचा गुणधर्म आहे. योगांचा उपयोग आपण शरीर तयार करण्याकडे करतो. व्यायाम केल्याने शरीराला थकवा येतो. उलट आसनाने थकवा न येता ताजेपणा टिकून राहतो. ध्यानधारणेसाठी मन शांत हवे. मनाची समस्थिती ठेवण्यासाठी आसने व प्राणायाम याची गरज आहे, असे विचार डॉ. मुकुंद भोळे यांनी मांडले.