आमदार शेळके यांच्या हस्ते पवना धरणाचे जलपूजन
पवनानगर – एका वर्षाच्या आत धरणग्रस्तांच्या समस्या मार्गी लावू, अन्यथा पुढील वर्षी जलपूजन करणार नाही, असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. आमदार शेळके यांनी सपत्नीक पवना धरण येथे जलपूजन केले. या वेळी ते बोलत होते.
वरुणराजाच्या कृपेने मावळ तालुका तसेच पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाच्या जलसाठ्याचे आज मावळचे आमदार सुनील शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. तसेच खणा नारळाची ओटी अर्पण करण्यात आली.
पवना धरण हे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड भागाला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण आहे. ऑगस्ट महिन्यात मावळ परिसरात झालेल्या पावसामुळे हे धरण 98 टक्के भरले असून, धरणातून दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण भरल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
धरणातील जलसाठ्याच्या पूजन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, कुसूम काशीकर, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजश्री राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम साखर कारखाना संचालक नरेंद्र ठाकर, ज्येष्ठ नेते महादू कालेकर, चंद्रकांत दहिभाते, नारायण ठाकर, नामदेव ठुले,ज्ञानेश्वर गोणते, संजय मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.