काठमांडू – भारत आणि चीन यांच्यात लडाख भागात एलएसीवर तणाव असताना आणि तो मिटण्याची चिन्हे दिसत नसताना नेपाळ या शेजारी राष्ट्रानेही पुन्हा एकदा अगाऊपणा केला आहे. भारताशी लिपुलेखच्या विषयावरून वाद उकरून काढणाऱ्या नेपाळने या भागात सैन्य तैनात केले असून भारतीय सैन्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले आहेत.
नेपाळच्या के पी शर्मा ओली सरकारने काही दिवसांपूर्वीच भारताच्या तीन भागांना आपला भाग असल्याचे दर्शवणारा नकाशा तयार करून त्याला संसदेत मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यानंतर त्यांनी भारताशी ही कुरापत उकरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. भारत-नेपाळ आणि चीन यांच्यातील ट्राय जंक्शनमध्ये लिपुलेख हा भाग येतो. उत्तराखंडच्या कालापानीच्या वरचा हा भाग आहे.
ओली सरकारने गेल्याच आठवड्यात नेपाळच्या लष्कराला या भागाची निगराणी करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर लिपुलेखमध्ये त्यांची 44 वी बटालियन तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, मिळालेल्या बातमीनुसार केवळ नेपाळच नव्हे, तर चीननेही या ट्राय जंक्शन परिसरातील आपली जमवाजमव वाढविण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिन्यातच चीनची 150 लाइट कॉम्बॅट ब्रिगेड येथे तैनात करण्यात आली आहे. तसेच सीमेपासून दूर 10 किमी अंतरावरही पाला भागात चीनचे सैन्य तैनात करण्यात आले आहे.
जुलै महिन्यात या भागात एक हजार सैनिक होते व एक स्थायी पोस्ट उभारण्यात आली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांत आणखी दोन हजार सैनिक येथे वाढविण्यात आले असल्याचे वृत्त एका माध्यमाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.