तापमान 45 अंशांच्या घरात : पावसाचाही अंदाज
पुणे – राज्यातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा पुन्हा तापला आहे. बहुतांश शहरातील तापमान 43 अंशाच्या पुढे गेले असून, बुधवारी (दि. 8) ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडे होते. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यामुळे चटका जाणवू लागला आहे. विशेषत: विदर्भ अधिक तापला असून, पुढील दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे दि. 11 आणि 12 रोजी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यातील काही प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
ब्रह्मपुरी 45.9, चंद्रपूर 45.8, नागपूर आणि वर्धा 45, बीड 44.1, परभणी 44, अमरावती 43.6, यवतमाळ 43.5, वाशिम 43.4, अकोला 43.1, नांदेड आणि गोंदिया 43, जळगाव 42, सोलापूर 41.1, मालेगाव 40.6, बुलढाणा 39.3, सांगली 37.2, सातारा 36.2, पुणे 35.8, कोल्हापूर 35.3, नाशिक 35,
पुण्याचा पारा 36 अंशांवर
पुणे शहरात मागील दोन दिवसांपासून कमाल तापमानासह किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. 24 तासांपूर्वी 39.1 अंश सेल्सिअस असलेल्या कमाल तापमानात बुधवारी (दि. 8) दोन अंश सेल्सिअसने घट झाली. त्यामुळे 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमानातही 3 अंशाने घट झाली आहे. दरम्यान, तापमानात घट झाली तरीही दुपारचा उकाडा कमी झाला नाही. रात्री हवेत गारवा असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. शहरात पुढील दोन दिवसात आकाश ढगाळ राहिल, कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.