कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्तीच्या मार्गावर
तालुक्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्याने कारखान्यांची धुराडी सध्या थंडावली आहेत. प्रतिवर्षी गळीत हंगामासाठी विदर्भातून ऊसतोड मजूरांना कारखान्यांकडून बोलावले जाते. या मजुरांची व कारखान्यांची वर्षानुवर्षांची घट्ट वीण झाली आहे. आपला संपूर्ण पसारा घेऊन कारखाना परिसरातच ते आपला संसार थाटत असतात. इतकेच काय या कारखान्यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळांची सोयही केली आहे. गळीत हंगाम संपल्याने ऊसतोड मजूर आपल्या गावी परतू लागल्याने संपूर्ण कारखाना परिसर सुनासुना बनू लागला आहे.
कोपर्डेहवेली – कारखान्याचा ऊसतोडणी हंगाम संपला की मजूरांची तसेच सोबत असणाऱ्या चिमुकल्यांची घराची ओढ नजरेला प्रकर्षाने जाणवणारी असते. पण त्यामागच्या व्यथा बेदखल असतात. कारखान्यांचा ऊस गाळपाचा हंगाम आटोपलेला आहे.
बहुतांशी मजूरांना गावाकडे मुबलक शेतजमीन, घरदार असते. परंतु कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती व जगण्यासाठी इतर सोय नसल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना ऊस तोडणीतून आर्थिक नियोजन करावे लागते. ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाल्यावर मजूरांची वर्दळ डोळ्यांसमोर येते. रस्त्याने लागलेल्या बैलगाड्यांच्या रांगा, पहाटे दोन-तीन नंतर ऊस तोडणीसाठी चाललेली मजुरांची लगबग, पुरूषांच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या महिला व लहानग्यांची शिक्षणाअभावी होत असलेली परवड हे सर्व उघड्या डोळ्यांना दिसते.
साखर कारखाना म्हटलं की ऊस तोडणी मजूरांची वस्ती नजरेसमोर येते. दर चार सहा महिन्यांनी उभारलेला निवारा मोडावा लागतो. स्वगृही परतण्याचे वेध म्हणजे प्रत्येक चार सहा महिन्यानंतर संसाराची करावी लागणारी आवराआवर. मात्र मजूर महिलांसाठी भावनिक असते. राहत्या ठिकाणी स्थानिकांशी सलोख्याचे संबंध तयार झालेले असते.
दरम्यान मुलेही कारखाना कार्यस्थळावरील साखर शाळेत व आसपासच्या वातावरणात रमलेली असतात. अशा वेळी ज्या खोपीचा निवारा घेतला. ती खोप कालांतराने मोडावी लागत असल्याची खंत मजूरांच्या मनात रहात असते. परंतू आपल्या घरी जाण्याची ओढ त्यांच्या नजरेत झळकलेली असते.