वाई शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या जीविताशी खेळ
समीर मेंगळे
भुईंज – वाई शहरासह तालुक्यातील गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांचे केंद्र वाई बनल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. वाई शहरातील शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच शंकर विठ्ठल मुळीक मु.पो. आंब्रग, ता. पाटण हा स्वामी कृपा क्लिनिक या दवाखान्यात बसून विनापरवाना आणि कुठलेही शासकीय लायसन नसताना राजरोसपणे येणाऱ्या पेशंटकडून बारा रुपये घेऊन त्यांना एक कार्ड देतो व बोगस औषधांची विक्री करत असतो.
औषध दिल्यानंतर त्यांच्याकडून 150 रुपये औषधांचा चार्ज भरून घेण्यात येतो. त्यासाठी गावोगावी व शहरातील नागरिकांकडे पांडुरंग ज्ञानदेव कांबळे याला लोकांना ही बोगस औषधे घेण्यासाठी पाठविले जाते. तो गेल्यानंतर बारा रुपये किंमतीचे एक कार्ड दिले जाते. ते कार्ड घेऊन पेशंटने लहान मुलांसह स्वामी कृपा क्लीनिक येथे हजर राहण्याचे कांबळे हे फर्मान सोडतात. पेशंट आल्यावर दवाखान्यात बसलेला शंकर मुळे हा प्रत्येकाकडून 150 रुपये सक्तीने वसुल करतो. अशा पेशंट पैकीच जितेंद्र वरे (रा. नावेचीवाडी, गंगापूरी) हे स्वामी कृपा क्लिनिक या दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी बोगसगिरी दिसून आल्याने त्यांनी वाई येथील मराठा महासंघाचे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष मकसूद शेख यांना या बोगसगिरीची माहिती दिली.
त्यांनी “दैनिक प्रभात’चे भुईंज प्रतिनिधी यांना ताबडतोब घटनास्थळी बोलावून स्वामी कृपा क्लिनिक या दवाखान्याचे स्टिंग ऑपरेशन करावे अशी विनंती केली. त्यानंतर “प्रभात’च्या प्रतिनिधीने बोगसगिरीच्या डॉक्टरी पेशाच्या मुळापर्यंत जाऊन बोगस औषधे व जनतेच्या आरोग्याशी खेळणारा पांडुरंग कांबळे आणि शंकर मुळीक यांच्या बोगस डॉक्टरीचा पर्दाफाश केला आहे. वास्तविक पाहता शासनाच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अशा गंभीर प्रकरणांचे छापे टाकून त्याचा बिमोड करणे आवश्यक असताना देखील त्यांनी या बोगस डॉक्टरांचा छडा न लावता त्यांना पाठीशी घालून हा व्यवसाय वाई शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्ये जोमाने सुरू ठेवण्यास एक प्रकारची मदतच केली आहे, हे यावरून सिद्ध होत आहे. त्यांच्या पाठीमागे शासनाचे सेवेतील कोणकोण डॉक्टर सहभागी आहेत, या प्रकरणाचीही सखोल चौकशीची मागणी होत आहे.
वाई तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून एका जबाबदार डॉक्टरची शासनाने बोगस डॉक्टरांचे जाळे मुळापासून उखडून काढण्यासाठी नेमणूक केलेली असते. गलेलठ्ठ पगार घेऊन देखील हे महाशय बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याऐवजी त्यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येते. वास्तविक पाहता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने किमान काही दिवस तरी अशा गंभीर प्रकरणांचा शोध घेणे आवश्यक होते.
समजा या बोगस औषधी विक्री प्रकरणात वाई शहरासह तालुक्यातील गावांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनी अशा गोष्टींना आळा घालण्याचे काम लोकप्रतिनिधीसह विविध संघटनांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. या बोगस औषध विक्रीतून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरी सातारा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष न करता याची दखल घेऊन बोगस डॉक्टरांना शोधून काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना गजाआड करावे. अन्यथा मराठा महासंघ जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष मकसूद शेख यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.