कासच्या पर्यावरणाला वाचविण्याची गरज
सातारा – जागतिक पातळीवरील जैवविविधतेने नटलेली “वर्ल्ड हेरिटेज साईट’ नव्हे तर मानवी हस्तक्षेप, खाणकाम आणि पवनचक्क्यांमुळे संकटग्रस्त झालेली साईट अशी पश्चिम घाटाची खरी ओळख आहे. जगभरातील तज्ज्ञांना या घाटाचे महत्त्व कळाले असले तरी प्रशासनाला याची अजिबातही काळजी नसल्याची टीका पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
कास पठारावर पर्यटकांमुळे ध्वनीप्रदूषण आणि प्लॅस्टिक कचरा वाढतो आहे. मानवी हस्तक्षेपामुळे या भागात वास्तव्यास असलेले वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. त्यातच वन विभागाने पठाराला कुंपण घालण्याचा निर्णय घेतल्याने येथील परिसंस्थाच धोक्यात येणार असल्याची टीका पर्यावरण अभ्यासक करीत आहेत.
वृक्षतोडीस बंदी असतानाही ऐन वन विभागाच्या हद्दीत चांदोली अभायरण्यामध्ये सध्या बेसुमार वृक्ष तोड आहे. कॅन्सरच्या औषधासाठी उपयोगी ठरणारी आणि या जंगलाचे वैशिष्ट्ये असलेल्या नरक्या वनस्पतीची भर दिवसा तस्करी होत असल्याचे स्थानिक लोक सांगतात. याबाबत वनाधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते कारवाई करीत नाहीत. राधानगरी अभायरण्य आणि कोयना अभयारण्यातही वृक्षतोड आणि वन्यप्राण्याच्या शिकारी होत असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. विशेष म्हणजे याच भागात पवनचक्क्या आणि खाणकामाच्या काही प्रकल्पांनाही सर्व नियम धाब्यावर बसवून हिरवे कंदील दाखविले आहेत.
आता या घाटाचे संरक्षणही सरकारला करावे लागणार आहे. पश्चिम घाटात सुरू असलेल्या बेकायदेशीर उद्योगांवर कारवाई करणे आवश्यक असून त्यासाठी पुढील दिशा कशी असावी, या बाबतच्या शिफारसी आम्ही पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समिती अहवालात सरकारला सुचिवल्या आहेत. त्यांची अमलबजावणी सरकारने करावी, अशी माझी विनंती आहे.
डॉ. माधव गाडगीळ, (ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ).