अधिकारी मिटिंगनिमित्त पुण्याला : कर्मचाऱ्यांची कामाला दांडी
अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ?
दरम्यान, विभाग प्रमुख कार्यालयात असले तरच 100 टक्के कर्मचारी उपस्थित असतात. विभाग प्रमुख शासकीय बैठक अथवा तालुका दौऱ्यावर जाताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होते. असाच प्रकार शुक्रवारी दिसून आला. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी वर्ग केले आहेत. मात्र, उर्वरित कर्मचाऱ्यांपैकी गैरहजर असेल तर असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.कार्यालयातही कॅमेऱ्यांची आवश्यकता
जिल्हा परिषदेच्या परिसरात, इमारतीमध्ये आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, विविध विभागामध्ये बहुतांश कर्मचारी कार्यरत असतात, अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणतेही कायदेशीर बंधन राहिलेले नाही. परिणामी कामामध्ये विलंब होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. हे रोखण्यासाठी सर्वच विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे.
सातारा – लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा प्रशासकीय कामांवर चांगलाच परिणाम दिसून येत आहे. मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरात आणि कार्यालयात शुक्रवारी दुपारी शुकशुकाट पसरला होता. विविध विभागांचे प्रमुख अधिकारी मिटिंगनिमित्त पुण्याला तर काही प्रमुख अधिकारी तालुका दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे बहुतांश कर्मचारी हजेरी नोंदवून पसार झाल्याचे देखील दिसून आले. आचारसंहिता लागू होवून आता दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. आता आचारसंहिता शिथिल होण्यास अद्याप पाच दिवस बाकी आहेत.
अशा स्थितीत सर्वच शासकीय कार्यालये आणि प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये ओसाड पडली आहेत. त्यापैकीच जिल्ह्यातील प्रमुख संस्थांपैकी सातारा जिल्हा परिषदेवर आचारसंहितेचा मोठा परिणाम जाणवून येत आहे. शुक्रवारी तर जिल्हा परिषदेला सुट्टी आहे की काय, असा प्रश्न पडावा इतका शुकशुकाट परिसरात आणि कार्यालयात ही निर्माण झाला होता. आचारसंहितेमुळे नव्याने कामे मंजूर होत नाहीत तसेच कोणताही धोरणात्मक निर्णय होणार नसल्यामुळे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हा परिषदेत येणे टाळले आहे.
तर आचारसंहितेपूर्वी मंजूर केलेल्या कामांची अंमलबजावणी एवढेच काम अधिकारी व कर्मचारी यांना शिल्लक आहे. त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे वातावरण रिलॅक्स आहे. शिक्षण विभागात मात्र, शिक्षक बदल्यांची धावपळ सुरू आहे. उर्वरित कृषी, समाज कल्याण, महिला व बालविकास, बांधकाम आणि आरोग्य विभागात तर दुपारी पावने तीन वाजण्याच्या सुमारास निम्म्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या. ह्या बाबत एका कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, अनुपस्थित कर्मचारी हे जेवायला तर अधिकारी मिटिंगसाठी पुण्याला गेले आहेत, असे सांगण्यात आले.