अविनाश काशीद
कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे ओळखावी कशी
कॅल्शिअम कार्बाईडने पिकवलेली फळे ही घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही. फळामध्ये योग्य ती पिकवन प्रक्रिया न झाल्यामुळे फळे चवीस आंबट किंवा चवहीन असतात. तसेच आतून काळसर रंग आणि विचित्र स्वाद असलेली असतात. याउलट इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनामुळे फिकणारी फळे ही पिकल्यानंतर थोडी मऊ होतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किंवा केशरी रंगाचा असतो.
पुसेसावळी – पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याची चव आणि स्वादही चांगलाच असतो. परंतु बाजारात येणारा आंबा हा रासायनिक पद्धतीने पिकवला जात असल्याने तो नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. ग्रामीण भागातील आंबा उत्पादक वगळता नैसर्गिंक पद्धतीने पिकविलेला आंबा बाजारात दिसेनासा झाला आहे. विशेष म्हणजे अश्या प्रकारे पिकवलेले आंबे नागरिकांना ओळखता येत नसल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
नैसर्गिकरित्या फळे पिकताना त्यामध्ये इथिलिन वायू तयार होतो व फळे पिकण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक फळानुसार ही नैसर्गिक प्रक्रिया फळे काढल्यानंतर 2 ते 5 दिवसांनी सुरू होते. हा अवधी जास्त असल्याने अनेक फळ उत्पादक, व्यापारी फळे लवकर पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कॅल्शियम कार्बाईडवर बंदी असताना सुध्दा हा प्रकार सर्रास दिसून येतो. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देवून हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार बंद करणे गरजेचे आहे.
भातपेंढा किंवा गवती पेंढ्याच्या थरावर फळांचा एक एक थर देऊन आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवला जातो. अशा पद्धतीने ठेवलेली फळे 8 ते 10 दिवसांत उत्तमप्रकारे पिकतात. सर्वसाधारणपणे फळे देठाकडून कोयीकडे, तर कोयीकडून सालीकडे अशा पद्धतीने आंबा पिकतो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यामध्ये काही ठिकाणी देठाच्या विरुद्ध भागास (चोचीकडे) आंबा थोडासा आंबट असतो. आंब्याच्या न पिकलेल्या फळांच्या अढीत काही पक्की फळे ठेवल्यास पिकण्याची क्रिया लवकर सुरू होते.
ग्राहकांनीही दक्ष राहावे
ग्राहकांनी फळे खरेदी करताना कार्बाईडचा वापर करून पिकविली नसल्याबाबत दक्ष राहून काळजी घेणे गरजेचे आहे. नेहमीच्या किंवा ओळखीच्या फळ विक्रेत्यांकडून फळे खरेदी करावीत, आंबा खरेदी करताना त्याच्या देठाकडे लक्ष द्यावे. देठाकडील भाग हिरव्या रंगाचा आढळल्यास तो कृत्रिमरीत्या पिकवलेला असतो. नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा पूर्णपणे पिवळ्या रंगाचा दिसतो. कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा पिवळा दिसत असला तरी देठाकडे हिरवा रंग असतो. कार्बाईडद्वारे पिकविली जाणारी फळे चकचकीत दिसत असली तरी त्यात नरमपणा जाणवत नाही. अशी फळे लवकर खराब होतात, त्यावर डाग पडतात. ग्राहकांनी या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे.
पाच लाखांपर्यंत दंडाची तरतूद…
अन्न व सुरक्षा कायद्यांतर्गत कार्बाईडचा वापर करून फळे आणि भाजीपाला पिकवण्यास बंदी आहे. कॅल्शियम कार्बाईडमध्ये जड धातू अनैसर्गिक व फॉस्फरसचे अंश असतात. ते मानवी आरोग्याला अपायकारक आहे. त्यामुळे घेरी येणे, वारंवार तहान लागणे, चिडचिड होणे, थकवा येणे, गिळण्यास त्रास होणे, उलटी होणे व त्वचेचे अल्सर असे आजार होतात. अशा कृत्यास कायद्यात सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक ते पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.