ऍड. उज्ज्वल निकम ः “बदलत्या युगाचा बदलता युवा’ विषयावर मार्गदर्शन
पिंपरी – धावपळीच्या युगात पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने सध्या तरुणाई सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. त्यामुळे अनेक तरुण आपल्या कर्तव्यापासून भरकटले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या तरुणांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे प्रतिपादन सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात “बदलत्या युगाचा बदलता युवा’ या विषयावर ते बोलत होते.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उन्नति सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समाज प्रबोधनकर शारदा मुंडे, दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारी तारा सोफेश धडफळे सेन्टर यांना आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार, वाल्मिक कुटे व योगेश मालखरे यांना सेवारत्न पुरस्कार, किशोर नखाते यांना मल्लविद्या रत्न पुरस्कार, अनिल पिंपळीकर व ज्ञानेश्वर जगताप यांना क्रीडारत्न पुरस्कार, उमेश धूत यांना अभिनयरत्न पुरस्कार, हर्षवर्धन यादव यांना क्रीडा रत्न पुरस्कार, सागर काटे यांना बलसेवारत्न पुरस्कार, शिवप्रसाद डांगे यांना शब्दरत्न पुरस्कार, हेमा खंडागळे यांना युवारत्न पुरस्कार ऍड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला उद्योजक शंकर जगताप, वसंत काटे, पी.के.स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, पवना बॅंकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नति सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, आनंद हास्य योगा क्लब, नवचैतन्य हास्य क्लब, अजिंक्य भिसे स्पोर्टस क्लबचे खेळाडू तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.