शहरातील तीनही मतदारसंघातील इच्छुक लागले कामाला
लोकसभेतील मताधिक्य उमेदवारीसाठी निकष?
राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभेच्या मैदानात उतरले होते. त्यांचा जय-पराजय हा निकष तसेच कोणाच्या प्रभागातून किती मताधिक्य पवारांना मिळाले, हे दोन निकष राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी ठरले जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी इच्छुकांची गर्दी या मतदारसंघात असली तरी लोकसभेच्या निकालानंतरच राष्ट्रवादीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पिंपरी – लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यास अद्यापही पंधरा दिवसांचा अवधी बाकी असतानाच शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघात युती आणि आघाडीतच लढती होणार आहेत. पक्षाची उमेदवारी मिळो-न-मिळो विधानसभा लढायचीच असे म्हणत अनेकांनी तयारीला सुरुवात केल्यामुळे आतापासून राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.
सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असले तरी महाराष्ट्रातील चौथा आणि शेवटचा टप्पा पूर्ण होताच विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी येणार असून केंद्रात येणारे सरकार आणि स्थानिक पातळीवर विजयी होणारा उमेदवार यावरच विधानसभा निवडणुकीचे गणित ठरणार आहे. असे असले तरी शहरातील तीनही मतदारसंघातील इच्छुकांनी मात्र आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीसाठी वॉर रुमचे उद्घाटन करून यामध्ये बाजी मारली आहे. शिवसेना आणि भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली असली तरी विधानसभेसाठी होणार की नाही हे निश्चित नसले तरी भाजपाचे तिकीट आपल्यालाच मिळणार या खात्रीने लांडगे हे कामाला लागले आहेत.
युती झाल्यास लांडगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून शिवसेनेच्या वाट्याला असलेला हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जाईल.
युतीकडून लांडगे लढल्यास कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून कोण? प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. विलास लांडे यांना लोकसभेतून माघार घेताना विधानसभेचा शब्द दिल्याची चर्चा असली तरी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दोघांपैकी पक्ष कोणाला संधी देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उबाळे, पवार यांची अडचण गतवेळी विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढले होते. शिवसेनेकडून सुलभा उबाळे तर भाजपाकडून एकनाथ पवार हे रिंगणात होते. भोसरीसाठी गतवेळी झालेल्या चौरंगी लढतीमध्ये उबाळे आणि पवार यांनी चांगली लढत दिली होती. युती झाल्यास महेश लांडगे यांनाच तिकीट मिळणार हे निश्चित असल्याने सेनेच्या उबाळे आणि भाजपाचे पवार यांची अडचण होणार आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांनी जोरदार तयारी चालविली आहे. गतवेळी भाजपाच्या आघाडीत हा मतदारसंघ रिपाईकडे होता. त्यामुळे भाजपाच्या इच्छुकांचा मोठा हिरमुड झाला होता. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. मात्र सध्याचे आमदार गौतम चाबुकस्वार यांना संधी मिळेल की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या शिवसेनेत कार्यरत असलेले जितेंद्र ननावरे यांचे नाव तिकीटासाठी आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर रिपाईने या मतदारसंघासाठी पुन्हा आग्रह धरला आहे.
भाजपाकडून खासदार अमर साबळे यांच्या कन्या इच्छुक असून गतवेळीही त्यांची संधी हुकली होती. याशिवाय अमित गोरखे यांनीही विधानसभेची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णा बनसोडे यांचे सुरुवातीला एकमेव नाव आघाडीवर होते. गतवेळी अतिआत्मविश्वास नडल्याने अवघ्या 2 हजार 235 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र कोणताही धोका स्विकारण्याची त्यांची तयारी नाही. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकीटासाठीच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. सध्या तरी बनसोडे यांचे नाव आघाडीवर असले तरी ओव्हाळ यांनी देखील विधानसभेच्या स्पर्धेत उडी घेतली आहे.
सावळे आयत्या वेळच्या उमेदवार?
पुर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या आणि सध्या भाजपाच्या नगरसेविका असलेल्या सीमा सावळे या आयत्यावेळी शिवसेनेच्या उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. बनसोडे यांना तगडे आव्हान देण्याची सावळे यांच्यात ताकद असल्याने तसेच पिंपरीतील महिला मतदारांमध्ये सावळे यांचा मोठा जनसंपर्क असल्याने त्या शिवसेनेच्या आयत्या वेळच्या उमेदवार ठरल्यास आश्चर्य नाही.
सर्वांत मोठी चर्चा सुरू आहे ती शहरात सर्वांत अधिक मतदार असणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची आहे. या मतदारसंघाने दोनवेळा आमदार लक्ष्मण जगताप यांना संधी दिली आहे. आजही या मतदारसंघात जगताप यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. गतवेळी झालेल्या निवडणुकीत जगताप यांनी राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश करत विजयही संपादन केला होता. सन 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून राहुल कलाटे यांनी तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी लढत दिली होती.
या लढतीमध्ये जगताप आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कलाटे यांच्यामध्ये दुप्पट मतांचे अंतर होते. यावेळी विधानसभेसाठी युती झाल्यास हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते असलेले राहुल कलाटे कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात इच्छुकांची मांदियाळी आहे. 2009 साली कॉंग्रेसकडून विधानसभा लढविलेले भाऊसाहेब भोईर सध्या राष्ट्रवादीत आहेत.
याशिवाय नाना काटे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे हे देखील राष्ट्रवादीकडून इच्छूक आहेत. तर आयत्यावेळी राहुल कलाटे देखील राष्ट्रवादीच्या गोटात सामिल होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप विरुद्ध सर्वजण अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास मात्र शिवसेनेकडून गजानन चिंचवडे किंवा राष्ट्रवादीतील नाराजाला पक्षात सामावून घेवून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभेतील युती विधानसभेलाही कायम राहिल्यास भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत या मतदारसंघात निश्चित मानली जात आहे.