विधानसभेसाठी मोर्चेबांधणी : मावळात राष्ट्रवादी, भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग
– रोहिदास होले
पिंपरी – पुणे जिल्ह्याचा कल कुणीकडेही असला तरी मावळमध्ये भाजपचेच “कमळ’ फुलते, असा गेल्या 25 वर्षांचा इतिहास आहे. दिगंबर भेगडे यांनी आमदारकीच्या दोन टर्म घेतल्यानंतर पक्षाने अनपेक्षितपणे आमदार बाळा भेगडे यांना 2009 मध्ये विधानसभेसाठी “प्रमोट’ केले. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला तडा जावू न देता भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करीत बाळा भेगडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.
आता बाळा भेगडे यांच्याही दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भाजपमधील अन्य इच्छुकांच्या आशेला “पालवी’ फुटली आहे. दुसरीकडे विरोधकांचे कच्चे दुवे शोधत त्यांनाच खिंडीत गाठत विजयाचा शिरपेच डोक्यावर ठेवण्यात भाजप यशस्वी होतो हा इतिहास आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस हा कडवा विरोधक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकजीव झाला आहे. पक्षांतर्गत कलह मिटविण्यात पक्षश्रेष्ठींनी यश मिळविले. तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वातावरण चांगले झाले आहे. स्थानिक मनोमिलनाकडे भाजप श्रेष्ठींना कानाडोळा करून चालणार नाही, हे ही तितकेच खरे आहे.
सिंहावलोकन : “2014′
लोकसभेला महायुती आणि महाआघाडी अस्तित्त्वात होती. मात्र विधानसभेला युती आणि आघाडीचा काडीमोड झाला आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप, मनसे हे प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्र लढले. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारांना नकाराधिकार (नोटा) पर्याय उपलब्ध झाला होता. या निवडणुकीत नऊ उमेदवारांनी नशिब आजमावले. 2014 मध्ये भाजपचे बाळा भेगडे यांनी 28 हजारांचे मताधिक्य घेत पुन्हा राष्ट्रवादीवर मात केली. त्यांनी 95 हजार 319 मते मिळविली. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माऊली दाभाडे राहिले. त्यांना 67 हजार 318 मतांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसच्या किरण गायकवाड यांना 17 हजार 624 मते मिळाली. शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे यांना 17 हजार 385, तर मनसेचे मंगेश वाळूंज यांच्या मतांचा आकडा तीन हजार 792 मतांवर थांबला. बहुजन समाज पक्ष आणि तीन अपक्ष उमेदवारांपेक्षा मतदारांनी “नोटा’ला अधिक पसंती दिली.
लोकसभा निवडणुकीचा निकालास पंधरा दिवसांचा अवधी असला तरी मावळात विधानसभेचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. युती झाली तर शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीकडून पक्षश्रेष्ठींनी “विद्यमानां’चे तिकीट कापून “2019’च्या राजकीय आखाड्यात पैलवान म्हणून आपल्यालाच संधी देतील, या आशेवर अनेक इच्छुकांची धडपड सुरू आहे. पक्षनेतृत्त्वाची मतदारसंघातील चाचपणी, स्थानिकांची मोर्चेबांधणी आणि राजकीय घडामोडी ठळकपणे दिसत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीतील घडामोडीही तितक्याच महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची तिकीटवारी निश्चित मानली जाते. मात्र तरीही आयत्यावेळी राजकीय समीकरणे बदलू शकतात. याशिवाय लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये राजकीय खलबते होतील, त्यादृष्टिने अन्य इच्छुकांनीही “फिल्डिंग’ लावली आहे.
मावळकडे भाजपचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. तालुक्यात गेली 25 वर्षे “कमळ’ फुलत आले आहे. रुपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे यांनी केंद्रात आणि राज्यात आघाडीचे सरकार असतानाही “मावळ’वर वर्चस्व राखले. भाजपचा दबदबा कायम ठेवत निवडणुकीत नेहमी कॉंटे की टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला दुसरी रांग सोडता आली नाही. परिणामी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कडव्या संघर्षाबरोबरच स्थानिक भाजप नेतृत्त्वाची खेळी नेहमीच वरचढ राहिली. यापूर्वी आघाडी आणि आता युतीमधील सत्तेच्या लाथाळ्यात तालुक्यात कॉंग्रेस आणि शिवसेनेला फारसे बाळसे धरता आले नाही. तरीही स्थानिक घडामोडींमुळे गेल्या काही वर्षांत कॉंग्रेस आणि सेनेने काही प्रमाणात का होईना कात टाकली, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
पुणे जिल्ह्याचा कल कुणीकडेही असला तरी मावळमध्ये भाजपचेच “कमळ’ फुलते, असा गेल्या 25 वर्षांचा इतिहास आहे. दिगंबर भेगडे यांनी आमदारकीच्या दोन टर्म घेतल्यानंतर पक्षाने अनपेक्षितपणे आमदार बाळा भेगडे यांना 2009 मध्ये विधानसभेसाठी “प्रमोट’ केले. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला तडा जावू न देता भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करीत बाळा भेगडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. आता बाळा भेगडे यांच्याही दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अन्य इच्छुकांच्या आशेला “पालवी’ फुटली आहे.
…म्हणून मावळात भाजप मजबूत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभरात 40 हून अधिक संघटना नोंदणीकृत असून, त्यातील काही संघटना मावळात आदिवासी समाजाच्या विकासासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. “आरएसएस’कडून हिंदुत्त्वाच्या धर्तीवर कार्यक्रम आणि साप्ताहिक बैठका सुरू आहेत. त्यामुळे भाजप उमेदवारासाठी ही जमेची बाजू आहे. तालुक्यातील भाजपयुक्त वातावरण कायम राखण्यासाठी “आरएसएस’ सतत प्रयत्नशील असल्याचे घडामोडींवरून स्पष्ट होते.
आमदार बाळा भेगडे यांच्यासह तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, “भाजयुमो’चे माजी तालुकाध्यक्ष तथा मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे आणि माजी नगरसेवक गणेश भेगडे यांची नावे आघाडीवर आहेत. वास्तविक पाहता मावळ तालुक्यात भाजपमध्ये स्थानिक नेत्यांची मोठी फळी आहे. मात्र “आर्थिक गणिते’ जुळत नाहीत, त्यामुळे तिकीटाच्या स्पर्धेत टिकाव लागणार नसल्याने तळेगावकरांपुढे ग्रामीण मावळचा विचार होत नाही. भाजपमधील इच्छुकांमध्ये अशीच रस्सीखेच राहिली, तर ग्रामीण भागाचा विचार पक्षश्रेष्ठी करणारच नाहीत, या भ्रमात तळेगावकरांनी राहू नये, अशी भावना व्यक्त होत आहे.
एकीकडे भाजपमध्ये इच्छुकांमध्ये रस्सीखेच असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पक्षांतर्गत गटबाजी विसरून राष्ट्रवादी कॉंग्रेस कधी नव्हे ती एकदिलाने एकत्र आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील “राजकीय फिवर’ असाच राहिला, तर विधानसभेला बदल घडेल, असा “प्रचंड आशावाद’ स्थानिक कार्यकर्त्यांना आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, नगसेवक बापूसाहेब भेगडे यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील, हे जवळपास निश्चित आहे. 2009 मध्ये बाळा भेगडे यांना त्यांनी चांगलीच टक्कर दिली होती. साखर कारखान्यामुळे बापूसाहेब भेगडे यांचा शेतकऱ्यांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे.
याशिवाय पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, पुणे पिपल्स बॅंकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांचीही नावे शर्यतीत आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख 37 हजार 657 मतदार आहेत. त्यापैकी एक लाख 74 हजार 816 पुरुष, तर एक लाख 62 हजार 841 महिला मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागेल, मात्र लोकसभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक वाद मिटविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा असून, गेल्या 25 वर्षांचा अभेद्य गड राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान असेल, यात शंका नाही.