“दैनिक प्रभात’च्या पाठपुराव्याने खडीकरणासह डांबरीकरण पूर्ण अखेर
विरमाडे – गेल्या अनेक वर्षांपासून विरमाडे रस्त्याची दुरवस्था झाली होती, मात्र गाव पुढारी आणि दैनिक प्रभातच्या पाठपुराव्याने अखेर विरमाडे रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे. नुकतेच या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विरमाडे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होऊन जवळजवळ 10 ते 15 वर्षांचा कालावधी लोटला होता, त्यातच कामही निकृष्ट झाले होते, त्यामुळे काम झाल्यानंतर अवघ्या दीड दोन वर्षांतच रस्त्यावर खड्डे पडू लागले होते, पावसाळ्यात तर रस्ता पूर्णतः उखडला होता. त्यांनतर ग्रामस्थांकडून केवळ रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत होती. परंतु संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चार पाच वर्षात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. दोन्ही बाजुने रस्ता पूर्णपणे खचला होता. त्यामुळे वाहने सोडा पण रस्त्याने चालणे ही मुश्किल होत होते. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत होती. परंतु संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींनीही विरमाडे ग्रामस्थांच्या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले होते. त्यानंतर दैनिक प्रभात ने विरमाडे रस्त्याचा प्रश्नावरुन लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले.
दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर स्वतः आमदार मकरंद पाटील यांनी विरमाडे रस्त्या प्रश्नी जातीने लक्ष घालून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईपर्यंत पाठपुरावा केला. नुकतेच विरमाडे रस्त्याचे काम पूर्ण झाले. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, दैनिक प्रभातने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केल्याने ग्रामस्थांनी प्रभाताचेही आभार व्यक्त केले.