राहुरी तालुक्यातील धामोरी ग्रामस्थांचा प्रशासनाबद्दल संताप
नगर – जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून उन्हाचा कडाखा जाणवत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या गंभिर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळोवेळी विविध पाणी योजना गावात सुरु करण्यात येत आहेत. परंतु या योजनांची अमंलबजावणी स्थानिक प्रशासनाकडून होत नाही. याची प्रचिती राहुरी तालुक्यातील धामोरी येथील ग्रामस्थांना आले आसून गावासाठी 45 लाख रूपये खर्च करून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम झाले असून अद्यापही ग्रामस्थांचा घसा कोरडाच असल्याचा संताप नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.
राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत 45 लाख रूपयांचा भरीव निधी शासनाकडून देण्यात आला. यामध्ये एक पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचेही निकृष्ठ दर्जाचे काम झाले असून वाड्या-वस्त्यांवर आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करावी व संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. एकीकडे जिल्ह्याभरात नागरिकांची तहान भागविण्यासाठी टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे निधी येवून ही नागरिकांची तहान भागवली जात नसल्याने संबंधित योजनेची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.