मुंबई – पुण्यातील कोंढवा परिसरातील ‘अल्काॅन’ या खासगी सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने शुक्रवारी रात्री भिंतीच्या बाजूला झोपड्या करून राहणाऱ्या १५ मजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. मूळचे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील रहिवाशी असणारे हे मजूर पुण्यामध्ये रोजीरोटीसाठी मजुरीचे काम करत होते मात्र या दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज पुण्यामध्ये घडलेल्या या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी, “आसपासच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी ‘अल्काॅन’ सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या दुरावस्थेबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र नागरिकांच्या या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जर त्या तक्रारीची दाखल घेण्यात आली असती तर त्या १५ मजुरांचे प्राण वाचले असते.” असा दावा केला.