नीरेतील प्राथमिक शाळेतील मुलांचे विठ्ठलाला साकडे
नीरा – येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी गेली अनेक वर्ष मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधून व्हावी, म्हणून या मोडकळीस आलील्या इमारतीस भेट देत- बा विठ्ठला, आमची शाळा लवकर बांधून होऊ दे रे बाबा ! असे म्हणत या चिमुकल्यांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली.
नीरा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल चार वर्षा पूर्वीच प्राप्त झाला होता. त्यानंतर धोकादायक खोल्या वापरण्यास बंद करून दोन सत्रांत शाळा भरवण्यात येत होती. मात्र, गेल्या वर्षी ही सर्वच इमारत धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिला, तेव्हापासून ही शाळा नीरा येथील रयत संकुलात भरत आहे. आज या शाळेतील मुलांनी आषाढी यात्रेनिमित्त वारकरी दिंडी काढली.
गावातून ज्ञानोबामाऊली! तुकोबांचा गजर करीत ही दिंडी निघाली होती. यावेळी ही मुले आपल्या जुन्या शाळे जवळून जाताना भावनिक झाली आणि तिथेच काही काळ थबकली. यावेळी काही पालकांनी मुलांशी संवाद साधला, त्यावेळी मुलांनी दिलेले उत्तर पाहून आश्चर्य वाटले. पालकांनी मुलांना विचारले की, माऊली तुम्ही वारीला आलात, काय सांगाल विठ्ठलाला?’ त्यावेळी मुले म्हणाली की, ही आमची शाळा लवकर बांधून व्हावी हेच मागण आमच.
विठ्ठलापाशी आहे’. अर्थात मुलाचं हे मागण विठ्ठलापाशी असलं तरी ही शाळा बांधणं मात्र शासनाच्या हातात आहे आणि ही शाळा कोणताही आडथळा न येत लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता पदाधिकारी व पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे काम केले तर ही शाळा लवकर बांधून होऊ शकते. या शाळेत नीरा व परिसरातील सुमारे 600 विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुलांच्या भावना योग्य आहेत. रयत संकुलात शिक्षण घेताना या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दररोज एक तास कमी करावा लागला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरकारने 18 तारखेपर्यंत मार्ग न काढल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करणार आहोत. गरज पडल्यास आम्ही मुलांना घेऊन जिल्हा परिषदेमध्येच शाळा भरवणार आहोत.
राधा माने, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन कमिटी