घोडनदीतील खड्डे : अपघाताला आमंत्रण
मंचर – घोडनदीला पावसाचे पाणी वाहत आहे; परंतु माफियांनी गौण खनिज उपशासाठी केलेले खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. नदीपात्रात खड्डे निर्माण झाल्याने पर्यावरणाचीही हानी होत असल्याने याला जबाबदार कोण? असा सवाल पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे.
नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. नदीपात्रात असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. खड्ड्यांतील पाण्यात पडून मृत्यू होण्याची घटना वडगाव काशिंबेग येथे नुकतीच घडली. नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकांना इतर ठिकाणीही आपला जीव गमवावा लागला आहे.
मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात गौण खनिजांचा उपसा झाला. हा उपसा यांत्राने केल्याने पात्राची चाळण झाली आहे. यातून नदीच्या काठाचेही नुकसान झाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. नदीपात्राची चाळण झाल्यामुळे पाणी प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. नदीतील पाणी स्वच्छ ठेवण्याकरीता गरजेचे प्रमाणच लुटले गेल्याने पाण्यातील प्रदूषण वाढले आहे. यातूनच जलपर्णीचा विळखा वाढला आहे.
पूर्वीच्या काळी उथळ असलेले नदीपात्र आता खोल झाले आहे. पूर्वी नदीपात्रात उतरत असताना हळूहळू नदी खोल होत जायची; परंतु, आता नदी उतरताना कधी खड्डा येईल आणि एकदम माणूस खाली जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नदीपात्रात असणाऱ्या पाण्याचा अंदाज येत नाही.
पारगांव-शिंगवे येथील चिंचगाई वस्तीजवळील घोडनदीपात्रात अशीच स्थिती निर्माण झाली आहे. प्रांतअधिकारी आणि तहसिलदार यांनी पाहणी करुनही याबाबत कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण
झाली आहे.