सातारा – दुष्काळी स्थितीने हाहाकार उडाला आहे. प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. कवडीमोल किमतीत पशुधन विकले जात असून जगायचे कसे असा प्रश्न माण-खटाववासियांना सतावत आहे. या दुष्काळी पट्ट्यासह अन्य तालुक्यांतही हे चटके बसत आहेत. पाण्यासाठी तर जनता कासावीस झाली आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्यामुळे जिल्ह्यातील तलाव व धरणांतील पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या 747 तलावांपैकी तब्बल 713 तलाव कोरडे ठाक पडले आहेत. 34 तलावात मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी माण व खटाव तालुक्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली. नागरिकांना पाण्यासाठी मैलो न् मैल वणवण भटकावे लागत आहे. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही. दुष्काळी भागातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश पाझर तलाव कोरडे पडले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेती व पिण्यासाठी मोठा आधार ठरणारे पाझर तलाव कोरडे पडले. पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेकडो एकर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे सातारा तालुक्यात 14, वाई 22, कोरेगाव 110, खंडाळा 50, फलटण 10, जावळी 7, खटाव 166, माण 213, कराड 59, पाटण 16 असे मिळून 747 पाझर तलाव आहेत. त्यापैकी तब्बल 713 पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तर फक्त 34 तलावात मृत पाणीसाठा उरला आहे.