वेल्लोर – तामीळनाडूमधील वेल्लोर येथे कार आणि ट्रक यांच्या झालेल्या अपघातात खामगाव (जि. बुलढाणा) येथील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अंगरक्षक आनंद देशमुख यांच्या कुटुंबातील 6 जणांचा, तर कार चालकाचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे खामगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आनंद देशमुख यांचे कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी वेल्लोर येथे त्यांच्या कारला हा भीषण अपघात झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास देशमुख कुटुंबाच्या कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडक दिली. हा अपघात अंबुर महामार्गावर झाला. ज्यामध्ये चालकासह कुटुंबातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात 3 पुरुष, 2 महिला आणि 2 चिमुकल्यांचा समावेश आहे.
रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरात धडक झाल्याने या अपघातात कोणीही बचावले नाही. तर हा अपघात इतका भीषण होता की, मृतदेह बाहेर काढण्यासाठी कार कापावी लागली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर अपघाताची माहिती आनंद देशमुख यांना देण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून 7 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर अपघात नेमका कसा झाला याचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, देवदर्शनासाठी जात असलेल्या संपूर्ण कुटुंबाचा असा अंत झाल्यामुळे देशमुख परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे, तर परिसरात शोककळा पसरली आहे.