कोरेगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एकाही कार्यकर्त्यावर खोट्या पोलीस केसेस केल्यास आपली गाठ सुप्रिया सुळे यांच्याशी आहे, याचे भान आ. महेश शिंदे यांनी ठेवावे, असा थेट इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला. दरम्यान, आ. शशिकांत शिंदे हे कोरेगावचे पुढचे आमदार असून त्यांचा साठावा वाढदिवस त्याच ठिकाणी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी मेळावा अंबवडे संमत वाघोली येथील श्रीराम चौकामध्ये झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मानाची चांदीची तलवार देऊन त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, वैशालीताई शिंदे, प्रभाकर देशमुख, सत्यजितसिंह पाटणकर, दीपक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रदीप विधाते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील जनता उपस्थित होती. दरम्यान, कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा थेट नामोल्लेख करत त्यांच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आहेत, अधिकाऱ्यांबद्दल ते चुकीचे बोलतात असे स्पष्ट करत खा. सुळे यांनी पोलीस यंत्रणेचा चुकीचा वापर केला जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला. ही महाराष्ट्राची आणि सातारा जिल्ह्याची तर बिलकुलच संस्कृती नाही. आ. महेश शिंदे शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करत आहेत. अजून दहा महिने आहेत, त्यामुळे असे प्रकार पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा खा. सुळे यांनी दिला.
दिल्लीतील अदृश्य शक्तींनी महाराष्ट्रातील मराठी माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. कर्तबगार नेते नितीन गडकरी यांचे अधिकार कमी करून मराठी नेत्याचे खच्चीकरण केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांचे पंख छाटले. शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली आणि महाराष्ट्राचे पर्यायाने मराठी माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम केले, अशी टीकाही खा. सुळे यांनी केली.
आ. शशिकांत शिंदे यांनी भाषणात विरोधकांवर हल्ला चढवला. गेल्या 20 ते 25 वर्षांच्या काळात मी माणसं कमावली. मागच्या निवडणुकीच्या काळात एक अपघात झाला. त्यानंतर सत्ता नसताना माझ्या कार्यकर्त्यांनी, शरद पवार साहेबांनी माझ्यावर प्रेम केलं. खा. श्रीनिवास पाटील साहेबांचा निकाल कळल्यावर ते सातारला यायला निघाले होते. परंतु, तेव्हाच माझा पराभव झाल्याचे कळले अन् दौरा रद्द केला. आठ दिवसांनी त्यांनी मला बोलावून घेतलं अन् शशिकांत मी तुला परत आमदार करतोय, असं सांगितलं. शत्रू पक्षात सर्वात जास्त भिती ही शरद पवार नावाची आहे. त्यामुळे जंग अभी शुरू हुई है, शरद पवार अभी बाकी है असे म्हणत आ. शशिकांत शिंदे यांनी विरोधकांवर शरसंधान केले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचीही भाषणे झाली. राहुल साबळे, प्रशांत पवार यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.