सत्ताधाऱ्यांच्या विविध धोरणांवर सुषमा अंधारे यांची टीका
पुणे – “भाजप जातीय तेढ निर्माण करत असून भाजपने स्वार्थासाठी संविधानाची तोडफोड सुरू केली आहे, असा आरोप आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. भाजपाचा जातीयवाद हा समाजाला घातक असल्याने या पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना हद्दपार करा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी हा आरोप केला. आमदार शरद रणपिसे, नगरसेवक सुभाष जगताप, प्रवीण गायकवाड, अनिल हातागळे, रमेश राक्षे आदी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे पर्वती विभागातील नेते सचिन तावरे यांनी यावेळी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. गणराज्य संघटनेशी संबंधित असलेल्या 22 संघटनांनी यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला.
“भाजपची पावले हुकुमशाहीकडे वळत असून त्यांच्या नेत्यांनी संविधानाविरोधात उघड भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या भूमिकेचा सर्वसामान्य नागरिक आणि दलितांना त्रास होत आहे, त्यामुळेच हा वर्ग हळूहळू त्यांच्यापासून दूर होत चालला आहे. आगामी काळात भाजपाची ही हुकुमशाही अशीच सुरु राहिल्यास त्यांचा अंतकाळ फार लांब नाही,’ असा सूचक इशाराही अंधारे यांनी यावेळी दिला.