नगर -लॉकडाऊनमुळे बचत गटातील महिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे. बचत गटाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे महिला बचत गटांचे लॉकडाऊन काळातील कर्जाचे हप्ते माफ करावेत, अशी मागणी महिला बचत गटांतर्फे जिल्हाधिकारी व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात आज जगताप यांना निवेदन देण्यात आले.
बचत गटाच्या झीनत बागवान, तसलीम शेख, फर्जाना सय्यद, शफिया खान, नाजमीन खान, मिनाज सय्यद, बानो पठाण, फरीदा शेख, नूरजहा सय्यद, संगीता बेंद्रे, अलका डिसूजा, सना शेख आदी महिला बचत गटाच्या सदस्या यावेळी उपस्थित होत्या. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी बॅंका व खासगी फायनान्सकडून विविध व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले आहे.
सर्व कर्जदार महिला सर्वसामान्य व गरिब कुटुंबातील आहे. आजपर्यंत महिलांनी अनेक वेळा कर्ज घेऊन त्याची प्रमाणिकपणे परतफेड देखील केली. मात्र, करोना महामारीच्या संकटात लॉकडाऊनमुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन राहिले नाही. बचत गटातील महिलांपुढे मागील तीन महिन्यापासून आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महिला मानसिक तणावाखाली असल्याची भूमिका त्यांनी मांडली.