म्हणे हा अंतर्गत कारभारात हस्तक्षेप
इस्लामाबाद : भारताने काल जे नागरीकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत संमत केले आहे त्यावर आता पाकिस्ताननेही आक्षेप घेतला आहे. शेजारील देशांतल्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचाच भारताचा हा हेतु आहे असे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या विस्तारवादी कटाचा हा भाग आहे असे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटर अकौंटवर याविषयी प्रतिक्रीया देताना पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, हे विधेयक सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन करणारे आहे, तसेच भारताने पाकिस्तानशी जे द्विपक्षीय करार केले आहेत त्याचाही भंग या विधेयकामुळे होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुराष्ट्र संकल्पनेच्या अविष्काराचाच हा एक भाग आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
तत्पुर्वी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयातर्फे या विषयी प्रतिक्रीया देणारे एक निवेदन जारी करण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, हे भेदभाव करणारे आणि अत्याचारी विधेयक असून आम्ही त्याचा निषेध करतो. दुष्ट हेतूने आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचाहीं एक प्रयत्न आहे असेहीं त्यांनी यात म्हटले आहे.