पिरंगुट- गेल्या दोन वेळेच्या निवडणुकीत आलेली मरगळ झटकून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी केलेल्या कामाच्या ताकदीवरच यावर्षीची निवडणूक जिंकले आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांचा पिरंगुट येथे आभार मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नानासाहेब नवले, रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, लक्ष्मी सातपुते, शांताराम इंगवले, आत्माराम कलाटे, सुभाष अमराळे, राधिका कोंढरे, महादेव कोंढरे, शंकर मांडेकर, अंजली कांबळे, कोमल वाशिवले, कोमल साखरे, सुनील चांदेरे, दिपाली कोकरे, निलेश पाडाळे, गंगाराम मातेरे, सुहास भोते, शिवाजी बुचडे, बाळासाहेब गोळे, अमित कंधारे, वैशाली गोपालघरे, कांताबाई पांढरे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढले आहे. यावर्षी गतवेळेच्या मताधिक्याचा “बॅकलॉक’ भरून निघाला आहे. बुथ नुसार कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे विजयी झाले आहे, याचे सर्व श्रेय कार्यकर्त्यांना आहे. आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघात पाणीप्रश्न आणि सुशिक्षित बेरोजगारी ही प्रमुख आव्हाने आहेत. यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश मोरे यांनी केले.
- मुळशी तालुक्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून काम केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात कॉंग्रेसचा मोठा हातभार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या धर्माचे पालन करून सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
– गंगाराम मातेरे, कॉंग्रेस अध्यक्ष, मुळशी तालुका