खांदेपालटाबाबत पक्षश्रेष्ठींची सावध भूमिका : संघटन मजबूत करावे लागणार
– रमेश जाधव
रांजणी – शिरुर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संघटन कौशल्याच्या अभावामुळेच सेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना मताधिक्यात मोठ्या फरकाने पिछाडीवर रहावे लागले. वास्तविक पाहता आंबेगाव तालुक्यात पदाधिकारी बदलाचा सूर शिवसैनिकांकडून वारंवार येत असताना पक्षश्रेष्ठीच पदाधिकारी बदलाच्या मूडमध्ये नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शिवसैनिक द्विधा मनस्थितीत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीने माजी खासदार आढळराव पाटील यांना आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पक्षाचे संघटन करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पक्ष अत्यंत कमकुवत असल्याचे झालेल्या मतदानावरुन दिसून येते. कारण पश्चिम आदीवासी भागात मतदारांनी आढळरावांना नाकारल्याचे मतदानातून दिसून येते. त्यामुळे भविष्यात पराभवाची जाणीव ठेवून शिवसेनेचे संघटन मजबूत करणे हाच एक पर्याय आढळरावांपुढे सध्यातरी आहे. त्यामुळे तालुक्यातील जुन्या पदाधिकाऱ्यांना नारळ देऊन नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत आढळरावांना आंबेगावातून चढत्या क्रमाने मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र त्यांना स्वकियांकडूनच दगाफटका बसल्याचे बोलले जात आहे. वास्तविक पाहता राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांची लोकप्रियता आणि जातीचे समीकरण आढळरावांच्या लक्षात आलेच नाही. तर त्यांनी लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घेतलीच नसल्याचा आरोप सामान्य शिवसैनिक करत आहे. दरम्यान, तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी बदलाची भाषा करत आहेत. मात्र खुद्द आढळराव पाटील त्याबाबत कानावर हात ठेवून असल्याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम अवस्था आहे.