मुंबई – राज्यातील काही भागांमध्ये काल अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत विधान परिषदेमध्ये बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी आज, ‘अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर बाधितांना नुकसानी भरपाई देण्यात येईल’ अशी माहिती दिली.
कालच्या अवकाळीमुळे राज्यातील २,८२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून याबाबतचे पंचनामे तयार करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागास देण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना वड्डेटीवार यांनी सांगितले की, “गारपिटीने नुकसान झाल्यास केंद्र सरकारतर्फे नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे प्रयोजन नाही. आपण हा प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू”