नवी दिल्ली : 47 बळी घेणाऱ्या दिल्ली दंगलीसाठी जबाबदार ठरवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजिनाम्यसाठी कॉंग्रेसने आपल्या हल्ला दुपटीने वाढवला. राहूल गांधी, शशी थरूर, आणि अधिर रंजन चौधरी यांच्यासह कॉंग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधीजीच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. तर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संसदेबाहेर रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.
“पंतप्रधानांनी उत्तर दिलेच पाहिजे’, “आमचा भारत वाचवा’ आणि “अमित शहा राजिनामा द्या’ असे फलक कॉंग्रेस खासदारांनी हातात घेतले होते. “”जेव्हा दिल्ली जळत होती, त्यावेळी आमचे गृहमंत्री ट्रम्प यांचे आदरातिथ्य करण्यात रममाण होते. आदरातिथ्य करणे ठिक आहे, पण पण ज्यावेळी भारतीय मारले जात होते, त्यावेळी त्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे अधिर रंजन चौधरी यांनी सांगितले.
या हिंसाचाराची नि:पक्ष चौकशी व्हायला हवी. या हिंसाचाराबाबत पंतप्रधान तीन दिवसांनी बोलतात. गृहमंत्री अद्याप अवाक्षर काढत नाहीत. दंगलग्रस्तांना भेटायला अजित डोव्हल यांना पाठवणे हे त्यांचे अपयश आहे, असे चौधरी संसदेबाहेर पत्रकारांना म्हणाले.
थरूर म्हणाले, दिल्लीत काय घडले याबाबत कॉंग्रेसला संसदेत चर्चा हवी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने गृहमंत्र्यांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी त्यांचे उत्तर दायित्व पार न पाडल्याने त्यांनी राजीनाम द्यायला हवा.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून राजधर्माचे पालन करावे, असे निवेदन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले होते. दिल्लीतील हिंसाचारावेळी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अमित शहा यांच्या राजिनाम्याची मागणीही कॉंग्रेसने केली होती.