मुंबई : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक लोकोपयोगी कामे केली असून या विकासकामांच्या जोरावरच भाजप शिवसेना महायुती मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी व्यक्त केला.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सीतारामन यांनी राज्य सरकारच्या पाच वर्षातील कामाची प्रशंसा केली. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस व भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, केशव उपाध्ये, संजय उपाध्याय उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला कार्यक्षम आणि विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक समाज घटकांसाठी योजना आखल्या. जलयुक्त शिवार सारख्या योजनेमुळे शेतीला शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच ग्रमीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी फडणवीस सरकारने निर्धाराने पावले टाकली असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
पाच वर्षांत एकही दंगल नाही
फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मुंबई किंवा महाराष्ट्रात एकही दंगल घडली नाही. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत हिंसाचार झाला नाही. जलयुक्त शिवार सारख्या योजनेमुळे शेतीला शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी फडणवीस सरकारने निर्धाराने पावले टाकली आहेत. दुष्काळात लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणी पुरविण्याची कल्पना फडणवीस यांनीच प्रत्यक्षात आणली. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळवून भाजप-शिवसेना महायुती सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला.