समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या व नेहमीच जिल्ह्याच्या राजकीय ‘हॉटस्पॉट’वर राहणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात यावेळी विधानसभा निवडणुकीचे चित्र ‘थंडा थंडा कूल कूल’ असेच पहायला मिळत आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी केवळ दहा दिवस उरलेले असताना प्रचार आणि निवडणुकीचे वातावरण दरवेळीप्रमाणे अपेक्षित उंचीला पोहचले नसल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षभरापासून तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जुळवाजुळव सुरू झाली होती. भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप आणि कॉंग्रेस नेत्या अनुराधा नागवडे ही तीन नावे प्रामुख्याने चर्चेत होती. 2014 च्या निवडणुकीत पाचपुतेंच्या पराभवासाठी सर्व पाचपुते विरोधकांनी एकीचे दर्शन घडवीत राबविलेल्या ‘श्रीगोंदा पॅटर्न’ची राज्यभर चर्चा झाली. यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यात काय घडणार याविषयी राजकीय अभ्यासकांना देखील उत्सुकता होती. स्वतःच्या नेत्यांचे समर्थन करताना कार्यकर्ते ‘समाज माध्यमांवर’ जीवाचे रान करीत होते.
नेतेमंडळी देखील सर्व तयारीनिशी मैदानात उतरणार, असे दिसत होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काळात तालुक्यात अतिशय वेगवान व धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली, तर कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांनी देखील माघार घेत निवडणुकीत कोणाला साथ द्यायची, याबाबतची आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. आ. जगताप, नागवडे यांनी धक्के दिल्याने कार्यकर्ते अद्याप सावरलेले नाहीत. पाचपुते, शेलार यांच्यात सरळ लढत होत असताना संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस किती मते घेतात, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
माजी मंत्री पाचपुते यांच्या विरोधात आ. जगताप किंवा नागवडे यांपैकी प्रतिस्पर्धी अपेक्षित असताना अचानक राष्ट्रवादीतर्फे घनश्याम शेलार हे रिंगणात आल्याने सर्वच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती बघायला मिळत आहे. आ. जगताप आणि नागवडे हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा समूह निवडणुकीपासून दूर आहे. एरव्ही ग्रामपंचायत निवडणुका लागल्या तरी राजकीय वातावरण ढवळून निघणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात यावेळी मात्र ऐन विधानसभा निवडणुकीत देखील राजकीय वातावरण ‘थंडा थंडा कूल कूल’ बघायला मिळत आहे.