पुणे – नागरिकांनी तात्पुरत्या प्रलोभनांना बळी न पडता निवडणुकांमध्ये योग्य उमेदवारालाच आपले मोलाचे मतदान करण्याचा विचार करण्याची गरज आहे. भारतीय लोकशाहीचे महत्व टिकवुन ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे, असे मत डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर यांनी व्यक्त केले आहे.
येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय लोकशाही” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा झाली. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र भोईवार यांनी ‘भारतीय लोकशाही आणि चित्रपट’, युनिक रिसर्च फाउंडेशनचे वरिष्ठ संशोधक केदार देशमुख यांनी ‘भारतीय लोकशाही : सद्य स्थिती आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान दिले.
भारतीय राज्य घटनेचे मह्त्व कायम स्वरुपी टिकले पाहिजे. राज्य घटनेची मोडतोड होता कामा नये यासाठी योग्य ती खबरदारी ही बाळगावीच लागणार आहे. भारतीय लोकशाही ही स्थिर राहिली पाहिजे. लोकशाहीला कोणतेही गालबोट लागता कामा नये. याकडे जाणिवपुर्वक लक्ष दिलेच पाहिजे, असे प्रा.राजेंद्र भोईवार यांनी सांगितले आहे.
आज लोकशाही ही केवळ निवडणुकांपुर्तीच मर्यादीत राहिलेली दिसत असून हे स्वरुप बदलेले पाहिजे. लोकशाही मुल्यांची जपवणुक ही करावीच लागणार आहे. लोकशाहीपुढे अनेक आव्हाने असून यांचा सामना हा करावाच लागणार आहे, असे मत केदार देशमुख यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवाजी मोटेगावकर यांनी केले. आभार प्रा.मंजुळा खोपडे यांनी मानले.