जनतेला अडचणीत आणणारे शेतकरीविरोधी सरकार घालवण्याचे आवाहन
कोरेगाव – महाराष्ट्रात आज सत्तेवर असलेले सरकार हे उद्योगपतींना धार्जिणे असून शेतकरी विरोधी आहे. राज्यातील जनतेला अडचणीत लोटणारे सरकार घालविण्यासाठी तरुणांनीच ही निवडणूक हाती घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंगेॅसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दरम्यान, भाजपचे लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्यावर पवार यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादीचे कोरेगाव मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मार्केट यार्डमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. आ. शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, दीपक पवार व पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ज्यांच्याकडे आपण सत्ता सोपविली त्यांनी सामान्यांचे हित पाहिले नाही. शेतकरी आत्महत्यांकडे पाहण्यास सरकारकडे वेळ नाही. मात्र, विशिष्ट हेतूने वित्तीय संस्थांना हात लावण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. साताऱ्यातून राष्ट्रवादीचा खासदार पाच वर्षांसाठी निवडून दिला होता. त्याने पावणेपाच वर्षे शिल्लक असताना राजीनामा दिला. ज्यांनी राजीनामा देऊन केलेले चुकीचे काम आपल्याला दुरुस्त करायचे आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी सरकारचे, पर्यायाने जनतेचचे 22 ते 25 कोटी रुपये खर्च होतात.
याचा विचार करण्याची वेळ आली आहे. श्रीनिवास पाटील यांनी दहा वर्षे खासदार आणि पाच वर्षे राज्यपाल म्हणून चांगले काम केले. आ. शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व असून त्यांनी मुंबईसारख्या महानगरात तरुणांना रोजगार दिला. त्यांनी आपला ठसा विधानसभेत उमटवला आहे. राज्य सरकारची कोंडी करणारा हा एकमेव आमदार असून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवायची संधी तुम्हाला आहे.
दुसऱ्याच्या घरात लक्ष घालणारा आमदार होऊ शकत नाही
शरद पवार यांनी भाजपचे उमेदवार महेश शिंदे यांच्यावर टीका करताच तरुणांनी घोषणाबाजी केली. मी चौकशी करत होतो की, कोण निवडणुकीला उभं राहतंय? नाटकात तुम्ही फिरता रंगमंच कधी पाहिलाय का? त्याप्रमाणे कोण कोठे जाईल, ते सांगता येत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ पक्ष बदलणारा कोरेगावचा प्रतिनिधी होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या घरात लक्ष घालण्याचा स्वभाव असलेल्या लोकांकडे सत्ता द्यायची नाही. कोरेगाव हा इतिहास निर्माण करणारा तालुका आहे, असे पवार म्हणाले.