Amit Shah | Punjab government | Arvind Kejriwal – लोकसभा निवडणुकीनंतर पंजाबातील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याची धमकी गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे, ही सरळसरळ हुकुमशाही आहे असे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री शहा यांनी रविवारी लुधियाना येथे एका प्रचार सभेत लोकांना पंजाबमधील भाजपच्या लोकसभा उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यास सांगितले आणि ते म्हणाले की भाजपच्या विजयानंतर भगवंत मान सरकार फार काळ टिकणार नाही.
त्या सभेचा संदर्भ देत सोमवारी अमृतसरमध्ये व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, तुम्ही अमित शहा यांचे वक्तव्य ऐकले आहे का? त्यांनी धमकी दिली. सुरुवातीला त्यांनी पंजाबींना खूप शिवीगाळ केली.
त्यांनी धमकी दिली की, ४ जूननंतर पंजाब सरकारचा नाश होईल. ४ जूननंतर भगवंत मान मुख्यमंत्री राहणार नाहीत. आमच्याकडे ९२ आमदार आहेत. तुम्ही सरकार कसे पाडू शकता? देशात हुकूमशाही पद्धतीने काम केले जात आहे असा आरोप केजरीवाल यांनी केला.
भाजप नेते उघडपणे सांगत आहेत की ते सीबीआय आणि ईडी मार्फत आमदारांना धमकावतील.आणि नंतर त्यांना खरेदी करतील. मला त्यांना सांगायचे आहे की पंजाबच्या लोकांना धमकावणे थांबवा, अन्यथा ते तुम्हाला पंजाबमध्ये प्रवेश करणे कठीण करतील, असे केजरीवाल यांनी नमूद केले.
तुम्ही इथे मते मागण्यासाठी येत आहात की सरकार पाडण्याची धमकी देण्यासाठी येत आहात असा सवाल त्यांनी अमित शहा यांना विचारला. अमृतसरमध्ये बोलताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. ते म्हणाले की, मोदींनी बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर मौन बाळगले आहे.
मोदी म्हणत आहेत की इंडिया आघाडी लोकांच्या म्हशी आणि ‘मंगळसूत्र’ हिसकावून घेईल,असले निरर्थक मुद्दे उपस्थित करण्याऐवजी मोदींनी लोकांसाठी काय करणार हे सांगितले पाहिजे. त्यांच्याकडे लोकांच्या समस्यांवर उपाय नाहीत. असे दिसते की ते दुसऱ्याच एका वेगळ्या दुनियेत जगत असावेत असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल यांनी ग्रामीण विकास निधीच्या ५५०० कोटी रुपयांसह पंजाबच्या वाट्याचे ९००० कोटी रुपये रोखल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रावर टीका केली. ते ‘गुंडागर्दी’ करत आहेत, त्यांनी राजकारण करणे थांबवले पाहिजे. हा त्यांचा पैसा नाही, पंजाबच्या जनतेचा पैसा आहे, असे ते म्हणाले.