पाटण – जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला असून त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे. या माझ्या मताशी माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत, अशी खोचक टिप्पणी उदयनराजे भोसले यांनी केली.
ते पाटण येथे शंभूराज देसाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजे पुढे म्हणाले, आज थोरले साहेब अर्थात शरद पवार हे साताऱ्यात येऊन मला काय आशीर्वाद देतात हे पहावे लागेल. आत्ता नरेंद्र पाटील शंभूराजे देसाई आणि मी असे एकत्र झालो आहोत. त्यामुळे मी पाटणची चिंता सोडलेली आहे.
कराड चिपळूण हा रेल्वे मार्ग सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून कोकणशी जोडला जाणार असून यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात व्यापाराचे जाळे निर्माण होईल. वांग-मराठवाडी आणि तारळी प्रकल्पाचे पाणी धरणाच्या वरील क्षेत्राला देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. माजी राजकारणातील भूमिका स्पष्ट असते मी लपून काही करत नाही. इशू बेस्ट पॉलिटिक्स यावर मी भर देतो. मी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तीन महिन्यात राजीनामा दिला जे लोकांना अपेक्षित होते तेच मी केले. पूर्वी सरसकट राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचे खासदार, आमदार होते मग हा परिसर अद्याप मागास राहिला अशी खंत व्यक्त केली.
नरेंद्र पाटीलांच्या मिशीला आजही घाबरतो
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नरेंद्र पाटील आणि तुम्ही गेल्या काही महिन्यांपूर्वी विरोधात निवडणूक लढवली होती. आता मात्र एकत्र आहात. पूर्वी तुम्ही त्यांच्या मिशीला घाबरत होता. असे विचारले असता उदयनराजे म्हणाले की मी आजही त्यांच्या मिशिला घाबरतो.