पिंपरी -स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मांडलेल्या स्वातंत्र्याविषयीच्या विचारांची महती शंभर वर्षानंतर देखील पटते. देशभक्ती, राष्ट्रभक्तीसाठी त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचे विचार रुजवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी व विचार प्रवर्तक शरद पोंक्षे यांनी नुकतेच निगडी प्राधिकरण येथे मांडले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मसमर्पण दिनानिमित्त नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या वतीने आयोजित सावरकर विचार दर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री राधिका देशपांडे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप सरचिटणीस विजय शिनकर, नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.
शरद पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून सांगितले.सुरुवातीला शब्दरंग साहित्य कट्टा कलाकारांनी जयोस्तुते या गीताने केली. त्याचे निवेदन ज्योती कानेटकर यांनी केले. चंद्रशेखर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बाबर यांनी आभार मानले.