उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या नेताजी चौकात तरूणावर तलवार आणि चाॅपरने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. सुशांत गायकवाड असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. गजबजलेल्या परिसरात दुपारच्यावेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
नेताजी चौकातील बंगलो परिसरात तलवार चॉपर घेऊन दहा ते पंधरा गुंडांनी सुशांतचा पाठलाग केला आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुशांत गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सुशांतला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याच्या साथीदारांनी सुशांत गायकवाड उर्फ गुट्ट्या याची हत्या केल्याचा संशय आहे. आकाश आणि मृत सुशांत हे लहानपणापासुन चांगले मित्र होते, पण काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला. या वादातून सुशांतची हत्या केल्याचे बोलले जात आहे. सुशांत गायकवाडही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता, त्याच्यावर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.