नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. दरम्यान, कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात सर्वतोपरी उपाय योजना आखण्यात येत आहेत. या मुद्द्यावर खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठे विधान केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना केजरीवाल यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि या परिस्थितीचा सामाना करणारा आपला देश या विषयांवर त्यांची मतं मांडली. कोरोना व्हायरसवर ल़ॉकडाऊन हा काही उपाय नाही. पण, या मार्गाने कोरोनाला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असं ते म्हणाले. शिवाय केंद्र सरकार आणि पंतप्रधानांकडून वेळीच घोण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केले.
मुळात कोरोनावर अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रभावी लस सापडलेली नाही. या परिस्थिती विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडला गेला. पण, त्यामुळे काही या विषाणूचा खात्मा होणार नाही. असं असलं तरीही वाढत्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यास नक्कीच मदत होईल, असेही ते म्हणाले.
मरकज आणि दिल्लीतील एकंदर परिस्थिती पाहता वातावरण तसे तणावाचे होते. पण, यातही सावधगिरी बाळगत जवळपास ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर, ३५ हजारहून अधिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले हे सांगत दिल्ली कोरोनाशी झुंज देत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.