नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने महिलांच्या सुरक्षेच्या संबंधातील जाहीरातबाजीत कोट्यावधी रूपयांचा चुराडा केला पण प्रत्यक्ष कृतीत मात्र त्यातील काहीच दिसत नाही त्यामुळे त्यांची बेटी बचाव आणि मिशन शक्ती या योजना केवळ पोकळ घोषणाबाजीच ठरल्या आहेत, अशी टीका कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे.
आपल्या फेसुबुक पोस्ट मध्ये त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या संबंधात विस्तृत तपशीलही दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या सरकारने मिशन शक्तीच्या नावाने मोठ गवगावा केला. जाहीरातबाजीवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा केला. पण उत्तरप्रदेशात या बाबत नेमकी काय स्थिती आहे याची कल्पना तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्याच मतदार संघांतील बातम्यांतून येईल.
मुख्यमंत्र्यांच्या गोरखपुर मध्ये अलिकडेच बारा महिलांचा त्यांच्यावरील अत्याचारांमुळे मृत्यू झाला आहे. यातील आरोपींना शिक्षा होणे तर दूरच पण मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळखही पटवण्याचे काम पोलिसांकडून काही प्रकरणांमध्ये झालेले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. या राज्यात महिलांच्या विरोधात अत्याचाराच्या दरररोज सरासरी 165 घटना घडतात.
येथे तक्रारदार महिलांनाच प्रशासन व पोलिसांकडून धुडकाऊन लावले गेले आहे, तशी शेकडो प्रकरणे उघडकीला आली आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांच्याविषयी सहानुभुती दाखवण्याऐवजी त्यांची थट्टामस्करी केली जात असल्याचेही प्रकार सातत्याने घडत आहेत असेही प्रियांकांनी म्हटले आहे.