लखनौ – बाबरी मशिद पतन प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्या समवेत ज्या 32 आरोपींची ट्रायल कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे, त्या सुटकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
आपल्या आव्हान याचिकेतील काही तृटी दूर करण्यासाठी आपल्याला अवधी देण्यात यावा अशी मागणी आज झालेल्या सुनावणीच्यावेळी याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर कोर्टाने दोन आठवडे ही सुनावणी तहकुब ठेवली आहे. अयोध्येतील रहिवासी हाजी महंमद अहमद आणि सय्यद अखलाक अहमद यांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे.
जफरयाब जिलानी हे त्यांचे या खटल्यातील वकिल असून जिलानी हे बाबरी मशिद कृती समितीचे निमंत्रकही आहेत. बाबरी मशिद पाडण्यात आल्याच्या घटनेचे आपण स्वता साक्षीदार आहोत असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
यातील सर्व आरोपी निर्दोष सोडण्यात आल्यानंतर त्या निर्णयाला सीबीआयने आव्हान देणे अपेक्षित होते, पण सीबीआयने ही आव्हान याचिका दाखल न केल्याने साक्षीदार या नात्याने आम्हीच ही याचिका दाखल केली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
यातील आरोपींच्या संबंधात अनेक सबळ पुरावे उपलब्ध असताना ट्रायल कोर्टाने ते पुरावे गांभीर्याने पहिले नाहींत आणि त्यांची योग्य दखल घेतली नाही असा याचिकाकर्त्यांचा मुख्य आक्षेप आहे.